छत्रपती संभाजीनगर, दि.३१(जिमाका)- मराठी भाषा संवर्धन पंधरवाड्यानिमित्त छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पहिले बालकुमार साहित्य संमेलन २०२६ आयोजित करण्यात येत आहे. जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा परिषद शिक्षण विभाग (माध्यमिक) यांच्या संयुक्त विद्यमाने हे संमेलन सोमवार, दि. ०२ फेब्रुवारी रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ६ या वेळेत द जैन इंटरनॅशनल स्कूल,संग्रामनगर उड्डाणपूल जवळ संभाजीनगर–उदगाव रस्त्याजवळ, शाहनूरवाडी, बीड बायपास येथे संपन्न होणार आहे.
विद्यार्थ्यांमध्ये मराठी भाषेची गोडी निर्माण करणे, वाचन-संस्कृती रुजवणे तसेच बालसाहित्याच्या माध्यमातून अभिव्यक्ती व सर्जनशीलतेला चालना देणे, हा या संमेलनाचा प्रमुख उद्देश आहे.
सकाळचे सत्र : ग्रंथदिंडी व उद्घाटन कार्यक्रम
सकाळी ८.०० ते ८.३० या वेळेत नाव नोंदणी होणार असून ८.३० ते ९.३० या वेळेत ग्रंथदिंडीचे आयोजन करण्यात आले आहे. ग्रंथदिंडी उद्घाटन मा. डॉ. राजेंद्र कावळे (प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था) यांच्या हस्ते होणार असून प्रमुख पाहुणे म्हणून मा. डॉ. सुनिता राठोड (वरिष्ठ अधिव्याख्याता, प्रादेशिक विद्या प्राधिकरण) उपस्थित राहणार आहेत.
यानंतर १०.०० ते ११.०० या वेळेत उद्घाटन समारंभ पार पडणार आहे. या समारंभाचे उद्घाटन मा. दिलीप स्वामी (जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी)यांच्या हस्ते होणार असून संमेलनाध्यक्ष म्हणून ज्येष्ठ बालसाहित्यिक डॉ. विशाल तायडे उपस्थित राहणार आहेत.प्रमुख अतिथी तथा मार्गदर्शन मा. अंकित (मुख्य कार्यकारी अधिकारी) करणार आहेत.शैलजा दराडे संचालक रा ,कैलास दातखीळ विभागीय शिक्षण उपसंचालक ,जयश्री चव्हाण ,शिक्षणाधिकारी प्राथ,अरुण शिंदि शिक्षणाधिकारी योजना उपस्थित राहणार असून स्वागताध्यक्ष म्हणून मा. अश्विनी लाडकर-पानसरें (शिक्षणाधिकारी, माध्यमिक) भूमिका पार पाडणार आहेत.
सत्र २ : कथाकथन
सकाळी ११.०० ते दुपारी १२.३० या वेळेत कथाकथन सत्र होणार आहे. या सत्रात विद्यार्थी आपल्या कल्पनाशक्तीच्या माध्यमातून कथा सादर करणार असून, कथाकथनातून भाषा, भावनिक अभिव्यक्ती व संवादकौशल्य विकसित करण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळणार आहे.
सत्र ३ : नाट्यछटा
दुपारी १२.३० ते १.३० या वेळेत नाट्यछटा सत्राचे आयोजन करण्यात आले आहे. लघुनाट्य, संवादात्मक सादरीकरण आणि अभिनयाच्या माध्यमातून विद्यार्थी सामाजिक व मूल्याधारित विषय प्रभावीपणे मांडणार आहेत.
दुपारचा भोजन अवकाश
दुपारी १.३० ते २.३० या वेळेत भोजन अवकाश ठेवण्यात आला आहे.
सत्र ४ : वादविवाद स्पर्धा
दुपारी २.३० ते ३.३० या वेळेत वादविवाद स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या सत्रातून विद्यार्थ्यांची तर्कशक्ती, मुद्देसूद मांडणी आणि विचारस्वातंत्र्य विकसित होण्यास मदत होणार आहे.
सत्र ५ : कविसंमेलन
दुपारी ३.३० ते सायंकाळी ५.०० या वेळेत कविसंमेलन होणार असून विद्यार्थ्यांना स्वतःच्या कविता सादर करण्याची संधी मिळणार आहे. बालमनातील भावना, निसर्ग, शाळा, समाज अशा विविध विषयांवर विद्यार्थ्यांची काव्यनिर्मिती अनुभवता येणार आहे.
सत्र ६ : समारोप समारंभ
सायंकाळी ५.०० ते ६.०० या वेळेत समारोप समारंभ पार पडणार आहे. या वेळी मान्यवरांचे मार्गदर्शन, सहभागी विद्यार्थ्यांचे कौतुक आणि मराठी भाषेच्या संवर्धनासाठी पुढील वाटचालीबाबत प्रेरणादायी संदेश दिला जाणार आहे.
विद्यार्थ्यांना सहभागाचे आवाहन
या पहिल्या बालकुमार साहित्य संमेलनात जिल्ह्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळांमधील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे, कथाकथन, नाट्यछटा, वादविवाद व कविसंमेलनाच्या माध्यमातून आपली साहित्यिक क्षमता व्यक्त करावी, असे आवाहन जिल्हा प्रशासन व शिक्षण विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. शिक्षक, पालक व शाळा व्यवस्थापनांनी विद्यार्थ्यांना या उपक्रमात सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करावे, असेही कळविण्यात आले आहे.
















