बारामती – मुंबई :- अजित पवार यांच्या अपघाती आकस्मिक निधनानंतर महाराष्ट्राच्या राजकारणाभोवती सुरू असलेल्या प्रश्न आणि अटकळांच्या पार्श्वभूमीवर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की परिस्थिती अशी आहे की अजित पवारांची जबाबदारी घेण्यासाठी कोणाला तरी पुढे यावे लागेल. मात्र सुनेत्रा पवार यांचा उपमुख्यमंत्री म्हणून शपथविधी होणार आहे याबाबत मला काही माहिती नाही. त्याचे नेते आहेत ते निर्णय घेऊ शकतात तो त्यांचा अधिकार आहे. प्रफुल पटेल सुनिल तटकरे हे नेते आहेत. या पवार यांच्या वक्तव्यामुळे भविष्यात राजकारण तापण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
शरद पवार यांनी सकाळी बारामती येथीस गोविंदबाग या निवासस्थानी सकाळी पत्रकार परीषदेत घेतली. यावेळी त्यांनी सांगितले की सुनेत्रा पवार यांच्या महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रीपदाच्या शपथविधीबाबत सध्या त्यांच्याकडे कोणतीही अधिकृत माहिती नाही. आपल्याशी कोणी चर्चा केली नाही सुनेत्रा यांच्याशी आपली चर्चा केली नाही असेही त्यांनी स्पष्ट केले. त्यांचा कोणताही निर्णय पक्षाच्या पातळीवर घेतला जाईल आणि अंतिम निर्णय पक्षच घेईल. पक्षातील लोकशाही प्रक्रियेद्वारे भविष्यातील कार्यवाही निश्चित केली जाईल, असेही ते म्हणाले.
विलीनीकरणाची चर्चा अंतिम टप्प्यात होती.
शरद पवार यांनी सांगितले की जयंत पाटील आणि अजित पवार गेल्या चार महिन्यांपासून दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या विलीनीकरणाबाबत चर्चा करत होते. या चर्चा सकारात्मक पद्धतीने पुढे जात होत्या आणि १२ तारखेला जाहीर घोषणा होणार होती. त्यांच्या मते, अजित पवार या प्रक्रियेबद्दल खूप गंभीर होते आणि त्यांना संघटना एकत्र करायची होती.
यावेळी अजित पवार यांची आठवण काढताना शरद पवार भावूक झाले. ते म्हणाले की, अजित पवार एक सक्षम, मेहनती आणि वचनबद्ध नेते होते जे नेहमीच सामान्य लोकांसाठी काम करत असत.त्यांना जनतेच्या समस्या सखोलपणे समजल्या आणि न्याय मिळवून देण्यासाठी ते सतत प्रयत्नशील राहिले. बारामतीचे लोक नेहमीच त्यांच्या पाठीशी उभे राहिले आणि त्यांनीही कधीही आपले कर्तव्य पार पाडण्यात कसूर केली नाही.
कुटुंबातील नवीन पिढीकडून अपेक्षा
अजित पवार यांच्या निधनामुळे निर्माण झालेल्या राजकीय आणि भावनिक पोकळीबद्दल बोलताना शरद पवार म्हणाले की, आता ताकदीने पुढे जाण्याची वेळ आली आहे. आपण लोकांच्या दुःख आणि वेदना कमी करण्यासाठी काम केले पाहिजे आणि अजित पवार यांनी ज्या मूल्यांनी आणि कार्यनीतीने लोकांची सेवा केली तीच मूल्ये आणि कार्यनीती पुढे नेली पाहिजे. कुटुंबातील नवीन पिढी त्यांचा वारसा आणि कार्यनीती पुढे नेईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
दरम्यान शरद पवार यांनी सुनेत्रा पवार यांच्या शपथविधी सोहळ्यात उपस्थित राहावं अशी विनंती करण्यासाठी अजित पवार यांचे पुत्र पार्थ सकाळीच गोविंदबागेत गेले होते सुमारे पावनेदोन तास त्यांच्याशी चर्चा केली. यावेळी खासदार सुप्रिया सुळे, आमदार रोहीत पवार तसेच युगेंद्र पवार उपस्थित होते. मात्र पार्थ यांच्या विनवनीला शरद पवार यांनी प्रतिसाद दिला नाही.














