भारतीय सिनेमा स्पर्धा गटातील चित्रपट दिग्दर्शकांनी साधला प्रेक्षकांशी संवाद
छत्रपती संभाजीनगर, दि. ३१ : अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात आज सायंकाळी भारतीय सिनेमा स्पर्धा गटातील चित्रपट दिग्दर्शकांशी संवाद हा विशेष चर्चासत्राचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. चित्रपटातून आपल्या सभोतालचे जग, समाज आणि वास्तव प्रभावीपणे उभे करता येते, हा विचार यामध्ये सहभागी मान्यवरांनी मांडला.
या चर्चासत्रात खिडकी गांव चित्रपटाचे निर्माते डॉ. एम. एन सुरेंद्रन, एकासीज डॉटर चित्रपटाचे दिग्दर्शक डॉ.जयंत दत्ता, चिंगम चित्रपटाचे दिग्दर्शक अभय शर्मा, मॅगझीन चित्रपटाचे दिग्दर्शक शुभम शेवडे, इंबू चित्रपटाचे दिग्दर्शक शिवद्वज शेट्टी, सिक्रेट ऑफ अ माऊंटेन, सेरपेंट चित्रपटाच्या दिग्दशिका निधी सक्सेना , सॉंग्स ऑफ फरगॉटन ट्रीज चित्रपटाच्या दिग्दर्शिका अनुपर्णा रॉय आणि बॅड गर्ल चित्रपटाच्या दिग्दर्शिका वर्षा भारथ आदि मान्यवरांनी या चर्चेत आपला सहभाग नोंदवला. या चर्चा सत्राचे संवादक म्हणून डॉ. मुस्तजीब खान यांनी मान्यवरांना बोलते केले.
भारतीय सिनेमा स्पर्धा गटात देशाच्या विविध भागांतून आलेल्या चित्रपटांमधून भाषा, लुप्त होत चाललेली संस्कृती, लोकजीवन, खेडी, नागरी प्रश्न, तरुणाई, महिला, लिंगभेद यांसारख्या विषयांचे प्रभावी चित्रण झाल्याचे या चर्चेतून स्पष्ट झाले.
या संवादात बोलताना निर्माते किरण केसव यांनी, मी अपघाताने निर्माता झालो. मात्र संकल्पनेवर विश्वास ठेवून, मर्यादित बजेटमध्ये प्रामाणिकपणे काम करण्याची भूमिका आमची होती. एका व्यक्तीची एक ठिणगीही मोठा बदल घडवू शकते, असे मला वाटते.
दिग्दर्शक अभय शर्मा यांनी आपल्या चित्रपटाच्या लेखन प्रक्रियेविषयी सांगताना, हिमाचल प्रदेशातील माझ्या गावात चित्रित केलेल्या या चित्रपटातून स्थानिक संस्कृती, वास्तव जीवन आणि पर्यटन-संवर्धन यांचा समतोल मांडण्याचा प्रयत्न केला आहे, असे नमूद केले.
दिग्दर्शक शुभम शेवडे यांनी आपल्या पहिल्या चित्रपटाचा अनुभव सांगताना, दुर्गम गावांमध्ये काम करताना एक वेगळीच शांतता मिळाली. या महोत्सवात चित्रपटाचा प्रीमियर होणे माझ्यासाठी विशेष आहे.
दिग्दर्शिका अनुपर्णा रॉय यांनी ‘पर्सनल इज पॉलिटिकल’ या भूमिकेचा उल्लेख करत, कौटुंबिक आठवणी, आजीच्या आयुष्यातील संघर्ष आणि स्त्रीजीवनाचे राजकीय-सामाजिक संदर्भ आपल्या चित्रपटात मांडल्याचे सांगितले.
दिग्दर्शिका निधी सक्सेना यांनी, पुरुषांच्या अनुपस्थितीत स्त्रियांचे आयुष्य, त्यांचे निर्णय आणि मानसिक संघर्ष हे विषय माझ्या चित्रपटाचे केंद्र आहेत, असे स्पष्ट केले.
दिग्दर्शिका वर्षा भारथ यांनी बॅड गर्ल चित्रपटाबद्दल बोलताना, स्त्रीला पडद्यावर आनंदी, मुक्त आणि सशक्त दाखवण्याचा माझा प्रयत्न आहे. भारतासाठी स्वतंत्र आणि स्थानिक संदर्भातील स्त्रीवादाची गरज आहे.
चर्चेदरम्यान भाषेचे महत्त्व अधोरेखित करत अनेक दिग्दर्शकांनी, भाषेतूनच संस्कृती जिवंत राहते. भाषा नष्ट झाली तर संपूर्ण संस्कृती हरवते, असा इशारा दिला. युवक प्रश्न, लिंगभेद आणि सांस्कृतिक जतन या विषयांवरही सखोल चर्चा यावेळी झाली. या संवाद सत्रातून भारतीय स्वतंत्र चित्रपटसृष्टीतील वैविध्य, सामाजिक बांधिलकी आणि सर्जनशीलतेचा व्यापक पट प्रेक्षकांसमोर उलगडला.
















