शहापूर : शहापूर तालुक्यात विविध कारणास्तव संथगतीने सुरू असलेले शहापूर तालुक्यातील भावली पाणी योजनेचे काम शहापूर तालुक्यातील पाणीटंचाईस कारण ठरण्याची दाट भीती व्यक्त होत आहे. शहापूर तालुक्यातील टंचाईग्रस्त गावांना पूर्ण क्षमतेने पाणीपुरवठा करण्यात जिल्हा प्रशासनाला यश येईल की नाही याबाबत शंका व्यक्त केल्या जात आहे. शहापूर तालुक्यातील दुर्गम आदिवासी भागातील नागरिकांना पाणी समस्येला दरवर्षी सामोरे जावे लागत आहे. यंदाच्या वर्षी ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण करावी लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
यावर्षी पावसाचा मुक्काम लांबला असला तरी शहापूर तालुक्यात टंचाईला डिसेंबर महिन्यातच सुरुवात झालेली आहे. काही ठिकाणी आतापासूनच पाण्यासाठी वणवण सुरू आहे. १२० गावे व ३०४ पाडे अशा एकूण ४२४ टंचाईग्रस्त ठिकाणांसाठी १७ कोटी २९ लाख रुपयांचा आराखडा मंजूर करण्यात आला आहे. तानसा भातसा व मोडकसागर अशी महाजलाशये शहापूर तालुक्यात असून सुद्धा तालुक्यात दरवर्षी पाणीटंचाईची समस्या कायम आहे. त्यावर मात करण्यासाठी नासिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यात ३२५ कोटी रुपये खर्च करून भावली पाणी योजना राबवली जात आहे. मात्र भावली धरणातून गुरुत्वाकर्षणाने पाणी शहापूर तालुक्यातील टंचाईग्रस्त गावांना पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. मात्र इगतपुरीचे आमदार हिरामण खोसकर यांनी बाधित होणाऱ्या गावांना पाणीपुरवठा करावा म्हणून पाणी उचलण्यासाठी ( वाय ट्रॅपिंग ) करण्याची मागणी केली आहे. तसेच वनविभागाच्या परवानगीमुळे काही ठिकाणी अडचण निर्माण झाल्याने भावली पाणी योजनेस विलंब झाला आहे. शहापूर तालुक्याला वर्षानुवर्ष टँकरने पाणीपुरवठा करावा लागत असून त्यासाठी कोट्यावधी रुपये खर्च होत आहेत. गेल्या दहा वर्षात टॅंकरने पाणीपुरवठ्यासाठी तब्बल २२ कोटी रुपये खर्च झाले असून; टंचाई आराखडे हे कायमस्वरूपी उपाय ठरण्याऐवजी ठेकेदारांचे त्यात फावले आहे. ठेकेदार मालामाल झाले आहेत. पावसाने यंदा पाच – सहा महिने मुक्काम ठोकूनही पाणीटंचाईचे चटके शहापूर तालुक्यात डिसेंबर मध्ये जाणू लागल्याने दुर्गम भागातील महिला बालकांची पाण्यासाठी वणवण सूरू आहे. तालुक्याच्या दुर्गम भागात दरवर्षी पाणीटंचाईच्या गावपाड्यात लक्षणीय वाढ होत असून टॅंकरने पाणीपुरवठा कराव्या लागणाऱ्या ३३८ गावपाड्यांसह पाणी योजनेचे विशेष दुरुस्ती, पूरक पाणी योजनेचे दुरुस्ती, व नवीन विंधन विहिरीची आवश्यकता असलेल्या १२० गावे व ३०४ पाडे अशा एकूण ४२४ टंचाईग्रस्त गाव पाड्यांसाठी १७ कोटी २९ लाख रुपयांचा आराखडा मंजूर करण्यात आला आहे. टंचाई आराखड्याला मंजुरी मिळाली असली तरी टँकर सुरू होईपर्यंत माता भगिनींना पाण्यासाठी वणवण करावी लागणार आहे.
# पुरवठ्यासाठी अंदाजीत खर्च
# यंदा टंचाईग्रस्त गावपाड्यांच्या संख्येत वाढ झाली असून टंचाई आराखड्यानुसार ८७ गावे व २५१ पाढे अशा एकूण ३३८ गावपाड्यांवर टँकरने पाणीपुरवठा करण्यासाठी चार कोटी रुपये खर्च येईल.
# नळ पाणीपुरवठा योजनांच्या विशेष दुरुस्ती मध्ये ३६ गावपाड्यांचा समावेश करण्यात आला असून त्यासाठी साडेसात कोटी रुपये खर्च होणार असून पूरक नळ पाणीपुरवठा योजनांच्या दुरुस्ती मध्ये समाविष्ट असलेल्या २३ गावपाड्यांसाठी किमान साडेपाच कोटी रुपये अपेक्षित आहे.
#टंचाई आराखड्यातील २७ गावपाड्यांमध्ये नवीन विंधन विहिरी करण्यासाठी २७ लाख रुपये खर्च होणार असून एकूण ४२४ गावपाड्यांसाठी तब्बल १७ कोटी २९ लाख रुपये खर्च होणार आहे. धरणांच्या तालुक्यात मंजूर झालेल्या टंचाई आराखड्यातील आकडे कागदावर झळकत असताना ग्रामीण भागातील महिलांना हंडाभर पाण्यासाठी महिलांना मैलोन मैल पायपीट करावी लागत आहे.
ठाणे जिल्ह्यातील शहापूर हा सर्वात मोठा आदिवासी तालुका आहे. हा तालुका मुंबईच्या हाकेच्या अंतरावर असून या तालुक्यात तानसा, वैतरणा भातसा ही मोठी धरणे आहेत.मात्र येथील नागरिकांना फक्त धरणातील पाणी पहावे लागते.’ धरण आमच्या उशाला आणि कोरड आमच्या घशाला ‘ अशी परिस्थिती या तालुक्यातील आदिवासी जनतेची आहे
# टँकरची प्रतीक्षा
गावची विहीर आणि असलेल्या कूपनलिका आटल्या की ,ग्रामस्थांना पाण्यासाठी टँकरवर अवलंबून राहवे लागते.आदिवासी भागातील अनेक महिला हंडा ,कलशी घेऊन दररोज पाण्यासाठी पायपीट करत असतात शासकीय यंत्रणेकडून ठोस उपाय योजना होत असल्याची खंत श्रमजिवी संघटनेचे प्रकाश खोडका यांनी व्यक्त करून पाणी टंचाई भागात टँकरने पाणीपुरवठा करावा अशीही मागणी त्यांनी केली.
















