जालना : वंचित बहुजन आघाडी पक्षाच्या वतीने गिरीश महाजन यांच्या विरोधात नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळलेली आहे. सर्वसामान्य नागरिकांमध्ये प्रचंड रोष पाहायला मिळत असून फुले–शाहू–आंबेडकर चळवळीतील कार्यकर्ते, संविधानप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले असून, अन्याय व दडपशाहीविरोधात आपला तीव्र निषेध नोंदवत आहेत.
प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात भाषणादरम्यान भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव न घेतल्याने मंत्री गिरीश महाजन वादाच्या भोवऱ्यात सापडले. या घटनेचे तीव्र पडसाद उमटत असून, जालना तालुक्यातील सेवली येथे वंचित कडून जोरदार निषेध नोदवण्यात आला. “गिरीश महाजन यांची मंत्रिमंडळातून तात्काळ हकालपट्टी करा,” अशी मागणी यावेळी करण्यात आली.
२६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य ध्वजारोहण कार्यक्रमात मंत्री गिरीश महाजन यांनी उपस्थितांना संबोधित केले. मात्र, या संपूर्ण भाषणात त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा उल्लेख केला नाही. ही बाब समोर येताच संविधानप्रेमी, दलित संघटना आणि वंचित बहुजन आघाडीमध्ये संतापाची लाट उसळली आहे. महाराष्ट्रात गिरीश महाजन यांचा नागरिकांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.
आज सेवली येथे वंचित कडून गिरीश महाजन यांच्या विरोधात घोषणाबाजी करत त्यांचा निषेध केला .
राज्यघटनेमुळे मिळालेल्या पदावर बसून घटनेच्या शिल्पकाराचे नाव विसरणे हा जाणीवपूर्वक केलेला अवमान असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीकडून करण्यात आला. अशा मानसिकतेच्या मंत्र्याला मंत्रिमंडळात राहण्याचा नैतिक अधिकार नाही, त्यामुळे सरकारने त्यांची हकालपट्टी करावी. तसेच गिरीश महाजन यांनी महाराष्ट्राच्या जनतेची आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयायांची माफी मागावी. अशी मागणी वंचित बहुजन आघाडी कडून करण्यात येत आहे.
यावेळी वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा उपाध्यक्ष दिपक डोके, जिल्हा सचिव गणेश खरात, दिलीप मगर, गौतम मगर,भगवान मघाडे, बबन खाडे, दत्ता काकडे, शहाजी खाडे प्रसाद सदावर्ते, शत्रूज्ञ कोळी,ईश्वर डोके, अदित्य डोके, सम्यक डोके युवराज तुरेराव, किरण डोके यांच्या सह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
















