सिल्लोड ( प्रतिनिधी ) दि.5 :- जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घाटनांद्रा व अजिंठा ता. सिल्लोड येथे शिवसेना उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित प्रचार सभेत आमदार अब्दुल सत्तार यांनी विरोधकांवर जोरदार शब्दांत टीकेची झोड उठवली. सभेला मार्गदर्शन करतांना त्यांनी विरोधकांचे अपयश, फसवे राजकारण आणि जनतेशी केलेली बेईमानी उघडकीस आणली. “फक्त निवडणुकीपुरते दिसणारे नेते आणि पाच वर्षे गायब राहणारे लोक आता जनतेची दिशाभूल करत आहेत,” असा थेट हल्ला त्यांनी केला.
विरोधकांनी सत्तेत असताना विकासाच्या नावाखाली केवळ पोकळ आश्वासने दिली, जनतेचे प्रश्न दुर्लक्षित ठेवले आणि स्थानिक स्वराज्य संस्थांचा वापर स्वार्थासाठी केला, असा गंभीर आरोप आमदार सत्तार यांनी केला. “शिवसेनेने नेहमीच सामान्य माणसाच्या प्रश्नांना प्राधान्य दिले. रस्ते, पाणी, वीज, आरोग्य, शिक्षण या मूलभूत प्रश्नांवर शिवसेनेचे काम बोलके आहे,” असे ठामपणे सांगत त्यांनी आमदार म्हणून केलेल्या कार्याची उजळणी केली.
“आज विरोधकांकडे सांगण्यासारखे काहीच उरलेले नाही, म्हणूनच ते खोट्या आरोपांचे राजकारण करत आहेत. पण जनता आता सुज्ञ आहे, कोण काम करणारा आणि कोण फक्त बोलघेवडा आहे हे ओळखायला ती सक्षम आहे,” असे म्हणत त्यांनी उपस्थित कार्यकर्ते व मतदारांमध्ये जोश भरला.
सभेच्या शेवटी आमदार अब्दुल सत्तार यांनी मतदारांना थेट आवाहन करत सांगितले की, आपल्या गटाचा, तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे आवाहन केले.
———-
घाटनांद्रा / अजिंठा येथे झालेली रेकॉर्ड ब्रेक प्रचार सभेने भारावून गेलो
मतदारांचा हा विश्वास उर्जादायी आहे – आमदार अब्दुल सत्तार
जिल्हा परिषद गटाच्या शिवसेना पक्षाच्या उमेदवार यांच्या प्रचारार्थ घाटनांद्रा , अजिंठा येथे आयोजित सभेला मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. घाटनांद्रा आणि अजिंठा येथे झालेल्या रेकॉर्डब्रेक सभेने मी मनापासून भारावून गेलो आहे. या सभेला लाभलेली प्रचंड उपस्थिती म्हणजे मतदारांनी आमच्यावर दाखवलेला विश्वास आहे. हा विश्वास आमच्यासाठी केवळ पाठिंबा नाही, तर पुढील कार्यासाठी मिळालेली नवी ऊर्जा आहे. जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आणि विकासाचा हा प्रवास अधिक वेगाने पुढे नेण्यासाठी आम्ही कटिबद्ध असल्याचे आमदार अब्दुल सत्तार म्हणाले.
















