छत्रपती संभाजीनगर, दि. ६ : महात्मा गांधी मिशन विद्यापीठाच्या इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन अँड फॉरेन लँग्वेजेस आणि केंद्रीय संस्कृत विद्यापीठ, नवी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने पालि भाषा शिक्षणासाठी आयोजित करण्यात आलेली २१ दिवसीय विशेष कार्यशाळा यशस्वीपणे संपन्न झाली. कार्यशाळेचा समारोप समारंभ विद्यापीठाच्या आईनस्टाईन सभागृहात पार पडला.
यावेळी एमजीएम विद्यापीठाचे कुलपती अंकुशराव कदम, नव नालंदा महाविहार विद्यापीठाचे माजी कुलगुरू प्रो.राम नक्षत्र प्रसाद, प्रो. रमेश प्रसाद, कुलसचिव डॉ. आशिष गाडेकर, डॉ. संजय मोहड, साधन व्यक्ती डॉ. जयवंत खंदारे, अधिष्ठाता डॉ. रेखा शेळके, संचालक डॉ. के. पी. सिंग, प्राध्यापक, संशोधक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ही कार्यशाळा १६ जानेवारी ते ५ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत घेण्यात आली. पालि भाषा, बुद्धकालीन साहित्य, तत्त्वज्ञान आणि सांस्कृतिक परंपरेचे महत्त्व अधोरेखित करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता. देशातील विविध राज्यांतून एकूण ४५ विद्यार्थ्यांनी व संशोधकांनी या कार्यशाळेत आपला सहभाग नोंदविला.
कार्यशाळेत एकूण १८ कार्य दिवसांत ७४ अध्यापन सत्रांचे आयोजन करण्यात आले. डॉ.प्रफुल्ल गडपाल, डॉ.प्रियांका, डॉ.जयवंत खंदारे, प्रा.रमेश प्रसाद आणि प्रा. रामनक्षत्र प्रसाद या तज्ज्ञ अभ्यासकांनी पालि व्याकरण, साहित्य, भाषांतर कौशल्य तसेच बौद्ध तत्त्वज्ञानावर सखोल मार्गदर्शन केले.
शैक्षणिक उपक्रमांसोबतच सहभागींसाठी अजिंठा व वेरूळ लेणी, घृष्णेश्वर मंदिर, गांधेली येथील एमजीएम कृषी विज्ञान केंद्र तसेच एमजीएम विद्यापीठातील विविध विभागांना शैक्षणिक भेटी देण्यात आल्या. ३० जानेवारी रोजी महात्मा गांधी यांच्या स्मृतिदिनानिमित्त शांतता फेरीचे आयोजनही करण्यात आले होते.
कार्यशाळेच्या कालावधीत दोन मौखिक व एक लेखी परीक्षा घेऊन सहभागींचे मूल्यमापन करण्यात आले. समारोप सत्रात मान्यवरांनी पालि भाषेच्या संवर्धनासाठी अशा उपक्रमांची आवश्यकता अधोरेखित केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.रिहाना सय्यद यांनी केले तर आभार डॉ. प्रज्ञा कोनार्डे यांनी मानले.
















