नांदेड, दि. 9 फेब्रुवारी :- शेतकऱ्यांनी पारंपारिक पिकांऐवजी रेशीम शेतीला प्राधान्य दिल्यास अधिक व निरंतर उत्पन्न मिळू शकते. रेशीम शेतीबाबत आवश्यक तांत्रिक कौशल्य आत्मसात करून प्रायोगिक तत्त्वावर शेती करावी. यासाठी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी नवीन तुती लागवडीसाठी नोंदणी करून रेशीम शेतीकडे वळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले.
आज जिल्हाधिकारी कार्यालयात महारेशीम अभियान 2026 अंतर्गत फिरत्या जनजागृती वाहनास जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून शुभारंभ करण्यात आला. यावेळी परिविक्षाधीन आयपीएस अधिकारी एन. एम. शशीकांत, निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर, उपजिल्हाधिकारी संजीव मोरे, उपजिल्हाधिकारी श्री. कोळेकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी पंचायत मनरेगा अमित राठोड, रेशीम अधिकारी पी. बी. नरवाडे, तांत्रिक अधिकारी कांचन जाधव, रेशीम शेती करणारे शेतकरी व जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी राहुल कर्डिले म्हणाले की, नांदेड जिल्ह्यातील हवामान रेशीम शेतीस अत्यंत अनुकूल आहे. लोहा तालुक्यातही रेशीम शेती यशस्वीपणे सुरू असून सध्या जिल्ह्यात सुमारे 500 ते 600 रेशीम शेतकरी कार्यरत आहेत. पारंपारिक पिकांना पर्याय म्हणून रेशीम शेती अनेक दृष्टीने फायदेशीर आहे. नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जालना व बीड येथे बाजारपेठ उपलब्ध असून वन्यप्राण्यांचा त्रास नाही, रोगराईचे प्रमाण कमी आहे, निरंतर उत्पन्न मिळते तसेच महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेतून (मनरेगा) अनुदान मिळते. त्यामुळे कमी कालावधीत सातत्यपूर्ण उत्पन्न देणाऱ्या रेशीम शेतीकडे शेतकऱ्यांनी वळावे, असे त्यांनी सांगितले.
यावेळी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी धनगरवाडी येथील रेशीम शेतकऱ्यांशी संवाद साधून रेशीम शेतीतून मिळणाऱ्या उत्पन्नाबाबत माहिती घेतली. यामध्ये धनगरवाडी येथील शेतकरी बालाजी काळे यांनी अवघ्या एका महिन्यात 1 लाख 76 हजार रुपयांचे उत्पन्न घेतल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच यावेळी महारेशीम अभियान 2026 च्या घडीपत्रिकेचे प्रकाशन करण्यात आले.
सन 2025-26 मध्ये शेतकऱ्यांनी समूहाने मनरेगा, सिल्क समग्र-2 व पोकरा योजनेंतर्गत तसेच वैयक्तिक स्वरूपात नवीन तुती लागवडीसाठी नोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले.















