गंगापूर तालुक्यातील नेवरगाव जिल्हा परिषद गट यंदाच्या निवडणुकीत संपूर्ण तालुका आणि जिल्ह्यात चर्चेचा केंद्रबिंदू ठरला. चौरंगी लढत, दिग्गज नेत्यांची मांदियाळी, प्रचार आणि सततच्या सभा असूनही निकालाने मात्र सर्व समीकरणे उलटी केली. धनशक्तीवर जनशक्ती भारी ठरली आणि सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या पाठीशी जनता ठामपणे उभी राहिली.
भाजपकडून राज्यातील नामवंत नेते अतुल सावे, डॉ. भागवत कराड, संजय केनेकर यांच्यासह गंगापूर मतदारसंघाचे आमदार प्रशांत बंब यांनी नेवरगाव गटात जोरदार प्रचार केला. मोठमोठ्या सभा, वाहन रॅली, प्रचार साहित्याचा मारा असूनही भाजपला या गटात अपेक्षित यश मिळू शकले नाही.
याचप्रमाणे शिवसेना (शिंदे गट) चे जिल्हा परिषद उमेदवार निवडणूक रिंगणात होते; मात्र त्यांनाही पराभव स्वीकारावा लागला. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाच्या सर्व उमेदवारांना देखील जनतेने नाकारले.
पंचायत समिती निकाल वेगळे संकेत देणारे
जिल्हा परिषद निकालाच्या तुलनेत पंचायत समिती निकालाने वेगळीच चित्रे स्पष्ट केली. शिवसेना उमेदवार नेवरगाव गणातून कांता गायकवाड आणि वाहेगाव गणातून राजेश्वर हिवाळे हे उमेदवार विजयी झाले. यामुळे स्थानिक पातळीवरील कामगिरी, व्यक्तीगत संपर्क आणि गावपातळीवरील विश्वास हे घटक किती महत्त्वाचे ठरतात, हे अधोरेखित झाले.
राष्ट्रवादीचा झेंडा, वैजयंती शिरसाठ यांचा विजय
या सर्व राजकीय उलथापालथीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या वैजयंती वाल्मिक शिरसाठ यांनी जिल्हा परिषद गटात विजय मिळवत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. विशेष म्हणजे त्यांच्या पंचायत समिती उमेदवारांना पराभव स्वीकारावा लागला असला, तरी जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादीचा झेंडा फडकवण्यात त्या यशस्वी ठरल्या.
२७ वर्षांच्या संघर्षाला मिळालेला कौल
या विजयामागे केवळ निवडणूक रणनीती नव्हे, तर वाल्मिक शिरसाठ यांच्या गेल्या २७ वर्षांच्या संघर्षाची पार्श्वभूमी आहे. प्रशासन आणि सामान्य नागरिक यांच्यातील दुवा म्हणून त्यांनी काम केले. शेतकऱ्यांचे प्रश्न, रस्ते, पाणी, वीज, शिक्षण, आरोग्य यांसाठी त्यांनी वेळोवेळी आंदोलने केली. सत्तेत नसतानाही सामान्यांच्या दुःखात धावून जाणारा नेता म्हणून त्यांनी मतदारांच्या मनात विश्वास निर्माण केला.
“गट म्हणजे कुटुंब” – ठाम भूमिका
जिल्हा परिषद सदस्य झाल्यानंतर जबाबदारी वाढल्याची जाणीव व्यक्त करताना वैजयंती शिरसाठ आणि वाल्मिक शिरसाठ यांनी स्पष्ट भूमिका मांडली.
“गट म्हणजे कुटुंब आहे. ग्रामपंचायतीत राष्ट्रवादीचा झेंडा असो वा नसो, मतदारांच्या विश्वासाला कुठेही तडा जाऊ देणार नाही. विकास हाच एकमेव अजेंडा असेल,” असे त्यांनी सांगितले.
गटातील अनेक अंतर्गत रस्त्यांची अवस्था अत्यंत खराब असून, पावसाळ्यात नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. विद्यार्थ्यांपासून ते रुग्णवाहन सेवांपर्यंत सर्वांनाच या रस्त्यांचा फटका बसत आहे.
जिल्हा परिषद शाळांच्या इमारतींची दुरुस्ती, स्वच्छतागृहे, पिण्याचे पाणी तसेच शिक्षणाच्या गुणवत्तावाढीसाठी आवश्यक सुविधा तातडीने उपलब्ध करून देण्याची मागणी पालकवर्गातून होत आहे
शेतवस्ती भागातील रस्ते, नियमित पाणीपुरवठा, वीज आणि इतर मूलभूत सुविधांचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित असून, त्यामुळे शेतकऱ्यांच्या दैनंदिन जीवनावर विपरीत परिणाम होत आहे.तसेच, शेतीमालाला योग्य दर, सिंचन व्यवस्था, विमा व नुकसानभरपाई यांसारख्या शेतकऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांवर लोकप्रतिनिधींनी केवळ आश्वासन न देता ठोस आणि वेळबद्ध कार्यवाही करावी, अशी जोरदार अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
















