छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी): येथील नारेगाव मध्ये सहेली महिला बचत गटाच्या वतीने नारेगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने साजरी करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व दीपप्रज्वलनाने झाली. उपस्थित महिलांनी शिवरायांच्या कार्याचा गौरव करत स्वराज्याच्या संकल्पनेची उजळणी केली.
कार्यक्रमात शिवाजी महाराजांच्या जीवनकार्याचा आढावा घेताना त्यांच्या जन्मापासून स्वराज्य स्थापनेपर्यंतचा प्रेरणादायी प्रवास उलगडण्यात आला. १९ फेब्रुवारी १६३० रोजी पुणे जिल्ह्यातील जुन्नरजवळील शिवनेरी किल्ल्यावर जन्मलेल्या शिवरायांना जिजामाता व शहाजीराजे यांचे संस्कार लाभले. बालपणापासूनच स्वराज्याची बीजे त्यांच्या मनात रुजली होती. रयतेवर अन्याय होऊ नये, शेतकऱ्यांचे हित जपले जावे आणि स्त्रियांच्या सन्मानाचे रक्षण व्हावे, यासाठी त्यांनी कठोर धोरण अवलंबले. रयतेच्या भाजीच्या देठालाही हात लावू नये, अशी सक्त ताकीद सैन्याला देणारे हे राजे आजही जनतेच्या मनात आदराचे स्थान राखून आहेत.
यावेळी बोलताना लक्ष्मी वाणी म्हणाल्या, “छत्रपती शिवाजी महाराजांनी शेतकऱ्यांचे हित जपले आणि स्त्रियांच्या सन्मानाचे संरक्षण केले. त्यांच्या प्रशासनात सामान्य रयतेला न्याय मिळाला. महिलांनी स्वावलंबी बनून समाजकार्यात सक्रिय सहभाग घ्यावा, हीच खरी शिवरायांना अभिवादनाची भावना आहे. सहेली महिला बचत गटाच्या माध्यमातून आम्ही महिलांना एकत्र आणून बचत, स्वावलंबन आणि सामाजिक बांधिलकीचा संदेश देत आहोत.”
आशु काळे यांनीही आपल्या भाषणात शिवरायांच्या शौर्य, दूरदृष्टी आणि प्रशासन कौशल्याचा उल्लेख करत महिलांच्या एकजुटीचे कौतुक केले.
कार्यक्रमास महिला बचत गटाच्या लक्ष्मी वाणी, मीरा काळे, स्वाती काळे, सुरेखा चौधरी, मनीषा चोरमारे, सुमित्रा चोरमारे, आशु काळे, माधुरी वाणी, कल्पना चक्रे, शारदा खरुळे, अलका मोकासे, चिंधाबाई डाबके, यमुना पंडागळे, सुनीता काळे, जया नेमाडे, दिपा कनगरे, उषा काळे आदी महिलांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांनी शिवरायांच्या विचारांनुसार समाजहिताचे कार्य करण्याचा संकल्प केला. महिला बचत गटाच्या या उपक्रमामुळे परिसरात प्रेरणादायी वातावरण निर्माण झाले असून, महिलांच्या संघटित शक्तीचे सुंदर उदाहरण या कार्यक्रमातून पाहायला मिळाले.
















