छत्रपती संभाजीनगर, दि.१९ : महात्मा गांधी मिशन विद्यापीठात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. इतिहास, संस्कृती आणि राष्ट्रपुरुषांविषयी अभिमानाची भावना विद्यार्थ्यांमध्ये दृढ व्हावी, या उद्देशाने आयोजित या कार्यक्रमाला विद्यापीठातील मान्यवरांसह विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. स्मार्ट सिटी, छत्रपती संभाजीनगरचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र जोगदंड हे कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू प्रा.डॉ. विलास सपकाळ होते, तर कुलपती अंकुशराव कदम, कुलसचिव डॉ.आशिष गाडेकर, सर्व अधिष्ठाता यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
यावेळी ‘शिवस्वरूप’ या विशेष चित्रप्रदर्शनाचे मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. या प्रदर्शनात छत्रपती शिवाजी महाराजांच्या विविध स्वरूपांचे दर्शन घडविणारी २२ चित्रे माहितींसह मांडण्यात आली होती. प्रत्येक चित्रासोबत ऐतिहासिक संदर्भ व वैशिष्ट्यपूर्ण माहिती देण्यात आल्याने विद्यार्थ्यांनी या प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. विशेष आकर्षण ठरले ते म्हणजे इ.स. १८७० च्या दशकातील शिवाजी महाराजांचे अस्सल चित्र, जे प्रा. आशुतोष पाटील यांच्या वैयक्तिक संग्रहातील असून प्रथमच विद्यापीठात प्रदर्शित करण्यात आले. या दुर्मीळ चित्रामुळे प्रदर्शनाला ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले असून उपस्थितांनी त्याचे विशेष कौतुक केले. हे प्रदर्शन २५ तारखेपर्यंत सर्वांसाठी खुले राहणार आहे.
उद्घाटनानंतर श्री. रवींद्र जोगदंड यांनी ‘रयतेचे राजे छत्रपती शिवराय’ या विषयावर प्रभावी व्याख्यान दिले. आपल्या व्याख्यानात त्यांनी शिवाजी महाराजांचे राज्यकारभार, लोककल्याणकारी धोरणे, स्वराज्याची संकल्पना आणि आधुनिक काळातील त्यांचे महत्त्व यावर सविस्तर प्रकाश टाकला. शिवाजी महाराज हे कुठल्याही एका जाती-धर्मापुरते मर्यादित नसून सर्व समाजघटकांना सोबत घेऊन चालणारे लोकनेते होते, असे त्यांनी ठामपणे प्रतिपादन केले. त्यांच्या विचारांमधील लोकाभिमुखता आणि व्यवस्थापन कौशल्य आजच्या प्रशासनासाठीही मार्गदर्शक ठरू शकते, असे त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व भूमिका कार्यक्रम समन्वयक प्रा. आशुतोष पाटील यांनी मांडली. त्यांनी या प्रदर्शनामागील संकल्पना, ऐतिहासिक संदर्भ आणि विद्यार्थ्यांना प्रेरणा देण्याचा उद्देश स्पष्ट केला. अध्यक्षीय भाषणात कुलगुरू प्रा.डॉ. विलास सपकाळ यांनी शिवचरित्रातील शौर्य, संघटनकौशल्य आणि लोकहिताची भावना विद्यार्थ्यांनी आत्मसात करावी, असे आवाहन केले.
या संपूर्ण कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सामाजिकशास्त्र संस्थेतील सर्व प्राध्यापक व कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. नियोजनापासून ते प्रदर्शन उभारणी, पाहुण्यांचे स्वागत, व्याख्यानाचे आयोजन आणि विद्यार्थ्यांचा सहभाग सुनिश्चित करण्यापर्यंत सर्व बाबींमध्ये त्यांनी सक्रिय भूमिका बजावली.
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन डॉ. ह. नि. सोनकांबळे यांनी केले. संपूर्ण कार्यक्रम अत्यंत उत्साही व प्रेरणादायी वातावरणात पार पडला असून विद्यापीठात इतिहास आणि संस्कृतीविषयी नवचैतन्य निर्माण झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.
















