छत्रपती संभाजीनगर,दि.३१ : चित्रपट निर्मिती ही सातत्यपूर्ण चालत राहणारी प्रक्रिया असून यामध्ये सर्जनशीलता, भावना, अंतःप्रेरणा, उत्कटता, अनुभव, आणि कामातील आनंद हे घटक महत्वाची भूमिका निभावतात. विशेषत: कृत्रिम बुद्धिमत्ता ही मानवी प्रतिभेला पर्याय ठरू शकत नाही. कथा लेखनापासून पडद्यावरच्या सादरीकरणापर्यंतचा हा प्रवास केवळ तांत्रिक नसून मानवी संवेदनांनी भरलेला असल्याचा सूर यावेळी झालेल्या परिसंवादातून मान्यवरांनी काढला.
अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात आज दुपारी आयनॉक्स, प्रोझोन मॉल येथे ‘सिनेमा : संहिता ते प्रदर्शन’ या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. चित्रपट निर्मितीच्या विविध टप्प्यांतील सर्जनशील प्रक्रिया, त्यामागील अनुभव, संघर्ष आणि संवेदनशीलतेचा प्रवास या परिसंवादातून मान्यवरांनी उलगडला. या परिसंवादात ध्वनी संयोजक पद्मश्री रसूल पुकूट्टी, संकलक आरती बजाज, दिग्दर्शक अनिरूध्द रॉय चौधरी, छायाचित्रणकार राफे मेहमूद, पटकथा लेखक उर्मी जुवेकर हे सहभागी झाले होते. महोत्सव संचालक सुनिल सुखथणकर यांनी संवादक म्हणून काम पाहिले.
पद्मश्री रसूल पुकूट्टी यांनी ध्वनी रचनेचे महत्त्व स्पष्ट करताना, ध्वनी हे अदृश्य असतात पण ते प्रेक्षकांच्या भावनांना दिशा देणारे प्रभावी माध्यम आहे. ध्वनी ही एक अवचेतन कला असून प्रत्येक दिग्दर्शकाच्या दृश्य कल्पनांशी सुसंगत ध्वनीनिर्मिती करणे हेच आपले काम असल्याचे त्यांनी सांगितले.
पटकथा लेखिका उर्मी जुवेकर यांनी आपल्या प्रवासाविषयी सांगताना नाटक, अभिनय, सहाय्यक दिग्दर्शन अशा विविध भूमिका निभावल्यानंतर अत्यंत विचारपूर्वक लेखन क्षेत्र निवडल्याचे स्पष्ट केले. मला शेवटी जाणवले की, कथा आणि संवादांच्या माध्यमातून स्वतःला अधिक प्रामाणिकपणे व्यक्त करता येते, असे त्या म्हणाल्या.
छायाचित्रणकार राफे मेहमूद यांनी पत्रकारितेपासून फोटोग्राफी आणि पुढे सिनेमॅटोग्राफीपर्यंतचा प्रवास उलगडला. मी माध्यम निवडले नाही तर माध्यमांनी मला निवडले आहे. मला एफटीआयआयमध्ये प्रवेश मिळाल्यानंतर माझा काही गोष्टींकडे पाहण्याचा दृष्टिकोण बदलला. स्टील फोटोग्राफी आणि सिनेमॅटोग्राफी या परस्परपूरक असल्याचेही त्यांनी नमूद केले.
संकलक आरती बजाज यांनी संपादन प्रक्रियेतील सूक्ष्म भावनिक पैलूंवर प्रकाश टाकला. शूटिंगमध्ये चित्र तयार होते पण एडिटिंगमध्ये चित्रपटाचा आत्मा जन्म घेत असतो. संपादन हे काम वैयक्तिक नव्हे तर ते पूर्णपणे सांघिक काम आहे. पटकथेशी भावनिक नातं जोडल्याशिवाय संपादन पूर्ण होत नाही, असेही त्यांनी सांगितले.
दिग्दर्शक अनिरुद्ध रॉय चौधरी यांनी चित्रपट ही पूर्णपणे सामूहिक कला असल्याचे सांगत, चित्रपटाची सुरुवात कथा असली तरी तो जीवनाशी जोडलेला असतो. मी कथा लिहीत नाही, तर कथा घडवतो. समाजावर प्रभाव टाकणाऱ्या कथा सांगणे हीच दिग्दर्शकाची जबाबदारी असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.















