छत्रपती संभाजीनगर :
विद्यार्थ्यांमध्ये लहान वयापासूनच पर्यावरण संवर्धनाची जाणीव निर्माण व्हावी, निसर्ग, शेती व देशी बियाण्यांशी त्यांचा थेट संबंध प्रस्थापित व्हावा या उद्देशाने यावी फॉर एनवायरमेंट संस्थेमार्फत शैक्षणिक वर्ष २०२५–२६ मध्ये राबविण्यात आलेला शालेय बीज प्रदर्शन हा अभिनव उपक्रम जिल्ह्यातील शासकीय व खासगी अशा ५० शाळांमध्ये यशस्वीरीत्या पार पडला. या उपक्रमातून २५,००० हून अधिक विद्यार्थ्यांपर्यंत थेट पोहोच साधण्यात आली.
या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना २०० हून अधिक प्रकारच्या देशी व भारतीय बियाण्यांची ओळख करून देण्यात आली. पाठ्यपुस्तकांच्या चौकटीबाहेर जाऊन अनुभवाधिष्ठित शिक्षण देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता. आजची पिढी निसर्ग व शेतीपासून दूर जात असल्याचे वास्तव लक्षात घेऊन जैवविविधतेचे महत्त्व प्रत्यक्ष अनुभवातून समजावे, यासाठी या उपक्रमाची संकल्पना विकसित करण्यात आली.
उपक्रमाच्या नियोजनाअंतर्गत प्रत्येक शाळेशी पूर्वनियोजित समन्वय साधून शिक्षक प्रतिनिधी नियुक्त करण्यात आले. विद्यार्थ्यांना आजी-आजोबा, शेतकरी व स्थानिक नागरिकांकडून माहिती संकलन करून बियाण्यांचे संकलन, वर्गीकरण, लेबलकरून प्रत्येक शाळेत किमान २०० बियाण्यांचे प्रदर्शन भरविण्यात आले असून विद्यार्थ्यांनी स्वतः माहिती सादर केल्यामुळे त्यांचा आत्मविश्वास, निरीक्षणशक्ती व अभिव्यक्ती कौशल्यात लक्षणीय वाढ झाली.
बीज प्रदर्शनासोबत स्मरणशक्ती स्पर्धा, माहिती सादरीकरण, बीज ओळख स्पर्धा व पर्यावरण विषयक उपक्रम अशा चार सहभागात्मक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. यामधून ३०० गुणवंत विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली.
या उपक्रमासाठी अध्यक्षा सौ. मेघना बडजाते, कार्याध्यक्ष श्री संजय आंबेकर, डॉ. संजय डांभारे (डीन, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय), श्री युनूस पटेल, श्री किरण मास्ट (मुख्याध्यापक संघ) तसेच ग्रामविकास गतिविधीचे श्री कैलास राठोड यांनी विशेष परिश्रम घेतले. शिक्षक, पालक व समाजाचा सक्रिय सहभाग या उपक्रमाला लाभला.
या उपक्रमाचा बक्षीस वितरण, समारोप व सत्कार समारंभ दिनांक ३ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी १० वाजता शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आला असून या प्रसंगी *पद्मश्री चैतरामजी पवार*, ज्येष्ठ पर्यावरणतज्ज्ञ, प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहून विजेत्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व पारितोषिक वितरण करणार आहेत.
या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये जैवविविधता, देशी बियाणे व पर्यावरणपूरक जीवनशैलीबाबत सकारात्मक दृष्टिकोन निर्माण झाला असून भविष्यात वृक्षलागवड, शेती व पर्यावरण संवर्धनाच्या चळवळीत सक्रिय सहभाग वाढेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. पुढील शैक्षणिक वर्षात हा उपक्रम १०० शाळांमध्ये राबविण्याचा संकल्प संस्थेमार्फत करण्यात आला आहे.
















