सिल्लोड :- महिलांकडे पाहण्याचा दृष्टिकोन आजही अनेकदा ‘अबला’ असा असला, तरी प्रत्यक्षात प्रत्येक क्षेत्रात आर्थिक सक्षमीकरण करण्याची ताकद महिलांकडे आहे. हेच सिल्लोड तालुक्यातील मंगरूळ येथील महिलांनी सिद्ध करून दाखवले आहे. राज्याच्या कृषी विभागाच्या संकल्पनेतून आणि ‘स्वयम् शिक्षण प्रयोग’ संस्थेच्या सहकार्याने येथील महिलांनी गांडूळ खत निर्मितीचा यशस्वी प्रयोग राबवून स्वावलंबनाच्या दिशेने दमदार पाऊल टाकले आहे.
गावातील महिलांनी केवळ घरापुरते मर्यादित न राहता संसाराचा गाडा समर्थपणे हाकण्यासाठी सेंद्रिय खत निर्मितीचा मार्ग निवडला आहे. पर्यवेशिका निकिता जंजाळ आणि सखी वंदना मरकडे यांच्या विशेष मार्गदर्शनाखाली गावातील सुमारे ५० महिलांनी आजवर विविध प्रयोग राबवले आहेत. चूल व मूल यावर मर्यादित न राहता कुटुंबाला हातभार लावण्यासाठी स्वावलंबनाच्या दिशेने महिलांनी सुरू केलेली ही घोडदौड वाखण्याजोगी आहे.
गांडूळ खत निर्मितीची ही संकल्पना राबवताना ‘स्वयम् शिक्षण प्रयोग’ (SSP) संस्थेचे प्रकल्प व्यवस्थापक सम्राट कसबे, तालुका समन्वयक अर्चना कोळी, वैशाली घुगे, पुष्पा तुपे आणि शुभम कुमावत या अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली प्रकल्पाची आखणी करण्यात आली. या प्रकल्पासाठी महिलांनी घेतलेली मेहनत आज सर्वत्र नजरेत भरत आहे.
मंगरूळ गावातील ही मोहीम यशस्वी करण्यासाठी निर्मला खेळवणे, कल्पना बर्डे, शितल मोडेकर, कीर्ती मोडेकर आणि वर्षा बोर्डे या महिलांनी अहोरात्र परिश्रम घेतले आहेत. ग्रामीण भागातील महिलांनी पुरुषांच्या तुलनेत आपण कुठेही मागे नाही, हे या प्रकल्पाच्या माध्यमातून कृतीतून सिद्ध केले आहे.
















