भालकी : गुरु रविदासांचे लायक अनुयायी बनाल तरच या देशाचे नायक व्हाल असे प्रतिपादन अखिल भारतीय गुरु रविदास समता परिषदेचे नेते प्रख्यात वक्ते इंजि. चंद्रप्रकाश देगलूरकर (नांदेड) यांनी केले.
नगरपालिका सभागृह, भालकी जिल्हा बीदर येथे आयोजित गुरु रविदास जयंती महोत्सवात प्रमुख वक्ता म्हणून इंजि. चंद्रप्रकाश देगलूरकर हे बोलत होते. युवा नेते व समाज संघटनेचे अध्यक्ष उमेश बोरुळे हे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. दिव्य सान्निध्य शिव बसव देवरु यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
आपल्या भाषणात इंजि. चंद्रप्रकाश देगलूरकर पुढे म्हणाले की, गुरु रविदासांनी सहाशे वर्षांपूर्वी राज्य समाजवादाचा सिद्धांत मांडला. त्यांच्या समतावादी बेगमपूर राज्याची संकल्पना साकार करायची असेल तर चर्मकार समाजाने अगोदर स्वतः लायक झाले पाहिजे व समदुःखी बहुजन समाजाला सोबत घेतले पाहिजे. आपले संघटन मजबूत केले पाहिजे.
याप्रसंगी गुरु रविदास समता परिषदेचे नेते शिवाजीराव लकवाले (उदगीर), धर्म संघटनेचे अध्यक्ष गोपाळ सुर्यवंशी (अळवाई), ज्येष्ठ नेते सुभाष टिळेकर, बाबुराव सोनकांबळे, ज्ञानोबा टिळेकर, ईश्वर कण्हेरी, मीनाताई जाधव यांनीही आपले विचार मांडले. सूत्रसंचलन संजू सोनकांबळे यांनी केले.
आदिवासी युवा नेते प्रवीण जेठेवाड (नांदेड), शिवाजीराव कांबळे, धनराज कमलेकर, दिपक बोरुळे, राजकुमार वासुदेव, सूर्यकांत टिळेकर, ॲड. अविनाश बोरुळे, धनराज सोनकांबळे, अनिल शिंदे, पवन वाघमारे, दत्तात्रय सोनकांबळे आदींची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. स्नेहभोजनानंतर कार्यक्रमाची सांगता झाली.
कार्यक्रमापूर्वी भालकी शहरातून गुरु रविदासांच्या प्रतिमेची वाजत गाजत भव्य मिरवणूक काढण्यात आली. यात महिलांची लक्षणीय उपस्थिती होती.
















