“माणसे जपायची असतात आणि पैसा वापरायचा असतो; पण आज लोक पैसा जपतात आणि माणसे वापरतात.” हे वाक्य केवळ तात्त्विक नाही, तर आजच्या समाजाचे अचूक एक्स-रे आहे. या एका ओळीत आपल्या सामाजिक अधःपतनाची, नात्यांच्या विघटनाची आणि मूल्यांच्या घसरणीची संपूर्ण कहाणी सामावलेली आहे. दुर्दैव इतकेच की, हे सत्य आपल्याला माहिती असूनही आपण त्याकडे जाणीवपूर्वक डोळेझाक करत आहोत. आजचा काळ हा केवळ आर्थिक स्पर्धेचा नाही, तर मानवी मूल्यांवर चाललेल्या अदृश्य युद्धाचा काळ आहे. या युद्धात पैसा जिंकतो आहे आणि माणूस हरतो आहे. पैसा कधीच वाईट नव्हता. तो माणसाच्या गरजांसाठी निर्माण झालेला एक साधन होता पण साधन हळूहळू साध्य बनू लागले आणि साध्य असलेला माणूस उपयुक्ततेच्या निकषांवर तोलला जाऊ लागला. आज माणसाची किंमत त्याच्या संवेदनशीलतेवर नाही, तर त्याच्या आर्थिक क्षमतेवर ठरते. आज समाजात विचारले जाणारे प्रश्न बदलेले आहेत. “तू कसा आहेस?” यापेक्षा “तू काय करतोस?” “किती कमावतोस?” “तुझा स्टेटस काय?” हे प्रश्न महत्त्वाचे ठरले आहेत. या प्रश्नांमागे माणसाविषयीची आपुलकी नाही, तर त्याच्या उपयोगितेची चाचपणी आहे.
पूर्वी नाती भावनेवर उभी राहायची. आज ती व्यवहारावर टिकतात. आज प्रत्येक नात्यामागे एक अदृश्य अट असते जोपर्यंत उपयोग, तोपर्यंत संबंध. मित्र तेव्हाच जवळचा, जोपर्यंत तो कामाचा आहे. नातेवाईक तेव्हाच आपले, जोपर्यंत त्यांच्याकडून काही मिळणार आहे. कार्यकर्ता तोपर्यंत महत्त्वाचा, जोपर्यंत तो मतांमध्ये रूपांतरित होतो. कर्मचारी तोपर्यंत हवासा, जोपर्यंत तो ‘प्रॉफिटेबल’ आहे. आज माणूस माणूस म्हणून स्वीकारला जात नाही; तो गुंतवणूक म्हणून पाहिला जातो. जिथे ‘रिटर्न’ नाही, तिथे संबंध संपवायला कोणालाही अपराधीपणा वाटत नाही. ही मानसिकता केवळ अमानवी नाही, तर समाजघातकी आहे. महानगरे विस्तारत आहेत. उंच इमारती उभ्या राहत आहेत. स्मार्ट सिटी, स्मार्ट रोड, स्मार्ट लाईफ सगळं काही ‘स्मार्ट’ होत आहे. पण या स्मार्टपणात माणूस मात्र एकटा पडतो आहे. एकाच इमारतीत राहणारी माणसं एकमेकांना ओळखत नाहीत.
शेजाऱ्याचा मृत्यू मोबाईल नोटिफिकेशनद्वारे कळतो. दुःखाला वेळ नाही, संवादाला उसंत नाही, माणसाला थांबवायला कोणी नाही. संपर्क वाढले आहेत, पण संवाद संपले आहेत. नेटवर्किंग वाढले आहे, पण नाती तुटली आहेत. कारण वेळ जपायचा असतो माणसांसाठी नाही, तर पैशासाठी. कुटुंब ही माणूस जपण्याची पहिली शाळा असते. पण आज तिथेही व्यवहार शिरकाव करू लागला आहे. वृद्ध आई-वडील “जबाबदारी” वाटू लागतात. मुलं “इन्व्हेस्टमेंट” ठरतात. लग्न हे नातं न राहता ‘सेटलमेंट’ बनते. आज प्रश्न असा उरलेला नाही की आपण कुटुंबासाठी काय करतो, तर प्रश्न आहे, आपल्याला त्यातून काय मिळतं? ज्या दिवशी नात्यांमधून अपेक्षा वाढतात आणि समजूत कमी होते, त्या दिवशी कुटुंब कोसळायला सुरुवात होते.
आजच्या आर्थिक व्यवस्थेत माणूस आकड्यात बदलला आहे. कामगार म्हणजे ‘कॉस्ट’. शेतकरी म्हणजे ‘डेटा’. रुग्ण म्हणजे ‘केस’. विद्यार्थी म्हणजे ‘फीस’. माणसाच्या वेदना, त्याचा संघर्ष, त्याची कथा या सगळ्याला व्यवस्थेत स्थान नाही. कारण त्यातून थेट नफा मिळत नाही. आपण विकासाच्या नावाखाली व्यवस्था उभी करतो, पण त्या व्यवस्थेत माणूस बसतच नाही आणि मग प्रश्न पडतो, हा विकास नेमका कोणासाठी? राजकारणात माणूस मतदार असतो. निवडणुकीच्या काळात त्याच्यासाठी घोषणांचा पाऊस पडतो. आश्वासनांची खैरात होते. पण निकाल लागल्यानंतर तो पुन्हा विसरला जातो. लोकप्रतिनिधी जपले जातात, सत्ता जपली जाते, निधी जपला जातो पण माणूस मात्र वापरला जातो. लोकशाहीचा आत्मा माणसात असतो, पण आज लोकशाही केवळ आकड्यांमध्ये उरली आहे. आज “वापरणे” ही सवय झाली आहे, नात्यांचा वापर, भावनांचा वापर, माणसांचा वापर. जो माणूस प्रश्न विचारतो, तो त्रासदायक ठरतो. जो झुकतो, तो उपयुक्त ठरतो. ही संस्कृती माणसाला गप्प बनवते, संवेदनांना बोथट करते आणि समाजाला निर्दयी बनवते आणि शेवटी, हाच समाज एकाकी, अस्वस्थ आणि हिंसक बनतो. पैसा साठवता येतो, पैसा वारसा देता येतो, पैसा बँकेत सुरक्षित ठेवता येतो, पण माणूस? तो जपला नाही, तर निघून जातो आणि तो गेला, की परत येत नाही.
आयुष्याच्या शेवटी पैसा उपयोगी पडत नाही. तेव्हा आठवण येते ती माणसांची, ज्यांना आपण वेळ दिला नाही, जपलं नाही, समजून घेतलं नाही. वेळ आहे, दिशा बदलण्याची, आजही वेळ गेलेली नाही पण त्यासाठी आत्मपरीक्षण गरजेचं आहे. आपण पैसा जपतोय की माणसं, याचा विचार करायला हवा. पैसा वापरायला शिका शिक्षणासाठी, आरोग्यासाठी, समाजासाठी पण माणसं जपा, कारण समाज माणसांवर उभा असतो, नफ्यावर नाही. जर आपण आजही माणसांपेक्षा पैशाला महत्त्व देत राहिलो, तर उद्या आपल्या भोवती सर्व काही असेल. घर, गाडी, संपत्ती पण कोणीच आपलं नसेल. कारण पैसा साथ देत नाही. तो फक्त साक्षीदार असतो आपल्या अपयशाचा. म्हणून माणसे जपायची असतात… कारण शेवटी माणूसच माणसाच्या कामी येतो.
















