छत्रपती संभाजीनगर : म.शि.प्र. मंडळ संचालित देवगिरी महाविद्यालयात वाणिज्य व व्यवस्थापन शास्त्र विभाग आणि विद्यांचल शिक्षण संस्थेचे व्ही. एस. एस. कॉलेज जालना यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 3 फेब्रुवारी 2026 रोजी रवींद्रनाथ टागोर सभागृहात सकाळी १०:३० वाजता “यशस्वी उद्योजक बनण्यासाठी विद्यार्थ्यांसाठी प्रशिक्षण ” राष्ट्रीय चर्चासत्राचे उद्घाटन संपन्न झाले. राष्ट्रीय कार्यशाळेचे उद्घाटक म्हणून मा. विश्वास मगर, उपायुक्त, जीएसटी, छत्रपती संभाजीनगर, अध्यक्ष म्हणून देवगिरी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. रवी पाटील, प्रमुख उपस्थिती प्राचार्य डॉ. प्रसाद मदन, व्ही.एस. एस. कॉलेज जालना, श्री. डी. यू. थावरे, उपप्राचार्य डॉ. गणेश मोहिते, उपप्राचार्य डॉ. अपर्णा तावरे, वाणिज्य विभागप्रमुख डॉ. राजेश लहाने, डॉ. कैलास ठोंबरे, यांची उपस्थिती होती.
प्रा. डॉ.राजेश लहाने यांनी प्रास्ताविकामध्ये राष्ट्रीय कार्यशाळेच्या आयोजनामागील भूमिका स्पष्ट केली. यशस्वी उद्योजक बनण्यासाठी विद्यार्थी प्रशिक्षण कार्यक्रमावर आधारित राष्ट्रीय चर्चासत्रांमध्ये, विद्यार्थी दशेतच नाविन्यपूर्ण कल्पना, कौशल्य विकास, आर्थिक साक्षरता आणि डिजिटल मार्केटिंग यांवर भर दिला जातो. महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाच स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यास मार्गदर्शन मिळण्यासाठी सदरील चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे.
राष्ट्रीय कार्यशाळेचे उद्घाटक मा. विश्वास मगर , उप आयुक्त, जीएसटी, छत्रपती संभाजीनगर यांनी आपल्या उदघाटकीय भाषणामध्ये महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना विद्यार्थ्यांनी वेळेचे व्यवस्थापन, आरोग्य, योगा व प्राणायाम इ. महत्त्वाच्या सवयी लावून घेणे अत्यंत आवश्यक आहे. तसेच विद्यार्थी जीवनात वाचनाची आवड जोपासताना विशेषता यशस्वी उद्योजकांचे चरित्र वाचावे त्याचा फायदा उद्योजक झाल्यानंतर निर्णय प्रकियेत निश्चितच होणार आहे.
प्राचार्य डॉ. प्रसाद मदन यांनी नोकरी करण्याऐवजी नोकरी देणारे यशस्वी उद्योजक होण्यासाठी केवळ चांगली कल्पना असून चालत नाही, तर ती प्रत्यक्षात आणण्यासाठी योग्य प्रशिक्षणाची अत्यंत गरज असते. बाजारपेठेतील नवीन संधी शोधणे, प्रतिस्पर्ध्यांचा अभ्यास करणे आणि नाविन्यपूर्ण कल्पनांचे व्यवसायात रूपांतर करणे याचे कसब प्रशिक्षणाद्वारे शिकता येते.
प्रभारी प्राचार्य डॉ. रवी पाटील यांनी आपल्या उदघाटन सत्राच्या अध्यक्षीय समारोपामध्ये सदरील राष्ट्रीय कार्यशाळा प्रधानमंत्री उच्चतर शिक्षा अभियान अंतर्गत आयोजित करण्यात आली आहे. नवीन शैक्षणिक धोरणामध्ये पारंपारिक शिक्षणासोबतच कौशल्याधारित शिक्षणाला महत्त्वाचे स्थान देण्यात आले आहे यामुळे अनेक नवीन स्टार्टअप सुरू होण्यास मदत होणार आहे. या कार्यशाळेचा नव उद्योजक बनण्यासाठी विद्यार्थ्यांना निश्चितच फायदा होईल अशी अपेक्षा करतो.
पहिले तांत्रिक सत्राचे मार्गदर्शक मा. डी. यु. थावरे, विभागीय अधिकारी, एमसीईडी, मुंबई यांनी “करिअर पर्याय म्हणून उद्योजकता” या विषयावर मार्गदर्शन करताना असे सांगितले की उद्योजकता हा तरुणांसाठी स्वावलंबन, सर्जनशीलता आणि नवकल्पनांना वाव देणारा प्रभावी करिअर पर्याय आहे. जोखीम स्वीकारण्याची तयारी, नेतृत्वगुण आणि सातत्यपूर्ण परिश्रम यामुळे उद्योजकतेत यश मिळते. उद्योजक केवळ स्वतःचा विकास करत नाही तर रोजगारनिर्मितीही करतो. देशाच्या आर्थिक प्रगतीत उद्योजकतेची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. प्रा. डॉ. भाऊसाहेव शिंदे या सत्राचे समन्वयक होते.
दुसरे तांत्रिक सत्राचे मार्गदर्शक हैदराबाद येथील यूजीसीच्या मालवीय मिशन शिक्षक ट्रेनिंग सेंटरच्या डायरेक्टर प्रा. सनिम फातिमा यांनी “विकसित भारतासाठी भारतीय ज्ञानाद्वारे शाश्वतता” या विषयावर विषयावर ऑनलाइन प्रणालीद्वारे मार्गदर्शन केले. मार्गदर्शन करताना भारतीय पारंपरिक ज्ञान, मूल्ये व जीवनशैली शाश्वत विकासाचा मजबूत पाया घालतात. निसर्गस्नेही दृष्टिकोन, संसाधनांचा संयमित वापर आणि समतोल विकास हे भारतीय ज्ञानाचे केंद्रबिंदू आहेत. भारतीय ज्ञानाचा समन्वय आधुनिक तंत्रज्ञानाशी केल्यास विकसित व शाश्वत भारताची उभारणी शक्य आहे. प्रा. डॉ.विवेक वायकर या सत्राचे समन्वयक होते.
तिसरे तांत्रिक सत्राचे मार्गदर्शक डॉ. श्रीकांत थोरात , शैक्षणिक समुपदेशक व व्यक्तिमत्व विकास प्रशिक्षक, छत्रपती संभाजीनगर यांनी “उद्योजकीय मानसिकता: विद्यार्थी ते उदयोजक” या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना असे सांगितले की विद्यार्थी जीवनात विकसित झालेली उद्योजकीय मानसिकता ही नवकल्पना, जोखीम स्वीकारण्याची तयारी आणि समस्यांकडे संधी म्हणून पाहण्याची दृष्टी निर्माण करते. ही मानसिकता विद्यार्थ्यांना केवळ नोकरी शोधणारे न राहता नोकरी निर्माण करणारे बनवते. कौशल्य, सर्जनशीलता आणि आत्मविश्वास यांच्या बळावर विद्यार्थी यशस्वी उद्योजक बनू शकतो. विद्यार्थी ते उद्योजक हा प्रवास राष्ट्राच्या आर्थिक व सामाजिक विकासाला गती देणारा ठरतो. प्रा. स्नेहा अशोक या सत्राच्या समन्वयक होत्या.
चौथ्था तांत्रिक सत्राचे मार्गदर्शक श्रीमती सीए कोमल राठी, करियर कौन्सिलर व मेंटार छत्रपती संभाजीनगर यांनी “विद्यार्थ्यापासून स्टार्टअपपर्यंत: सामान्य कल्पना यशस्वी व्यवसाय कशा बनतात” या विषयावर
कार्यशाळेत सहभागी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना विद्यार्थी जीवनातील साध्या कल्पना संशोधन, नवकल्पना व सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे स्टार्टअपमध्ये रूपांतरित होतात. योग्य मार्गदर्शन, कौशल्यविकास आणि तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर यामुळे कल्पनांना बाजारपेठ मिळते. ही प्रक्रिया रोजगारनिर्मितीला चालना देत आत्मनिर्भर व नवउद्योजक भारत घडवते. प्रा. अमृता पाटील या सत्राच्या समन्वयक होत्या.
या राष्ट्रीय कार्यशाळासाठी 206 विद्यार्थी व प्राध्यापक यांची उपस्थिती होती. राष्ट्रीय चर्चासत्र यशस्वी करण्यासाठी डॉ. कैलास ठोंबरे, डॉ. विवेक वायकर, डॉ. प्रणिता चिटणीस, डॉ. भाऊसाहेब शिंदे डॉ. ज्ञानेश्वर जावळे, डॉ. नम्रता देशमुख, प्रा. जय मिनासे, प्रा. सोनल तिवारी, प्रा. प्रतीक्षा वाहुळ इत्यादींनी परिश्रम घेतले.
















