अजितदादांच्या निधनानंतर लागलीच दोन राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाच्या मुद्द्यावर उबाठा खासदार संजय राऊत राजकारण करत होते. मात्र आजच्या पत्रकार परिषदेतील वक्तव्यावरून राऊतांना उपरती झाल्याचे दिसत आहे. राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाचा मुद्दा हा दोन राष्ट्रवादींमधील अंतर्गत बाब आहे असे आजच्या पत्रकार परिषदेत राऊत म्हणाले. शरद पवार एनडीएमध्ये जातील या भीतीने आता राऊतांच्या पोटात गोळा उठल्याने ही उपरती झाल्याची खोचक टीका भारतीय जनता पार्टीचे माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन यांनी गुरुवारी केली. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. उपमुख्यमंत्री सुनेत्राताई राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाबाबत जो निर्णय घेतील त्याला पाठिंबा असेल, अशी भाजपाची पहिल्या दिवसापासून भूमिका असल्याचा पुनरुच्चार श्री. बन यांनी केला.
महापालिका निवडणुकीनंतर महाविकास आघाडीचे अस्तित्व पुसले गेले. आज मविआमध्ये नेमके कोण आहेत, हा प्रश्न निर्माण झाला आहे. मविआ फक्त नावापुरती उरली आहे, विधानसभा निवडणुकीत मविआ ची शकले उडली होती, महापालिका निवडणुकीनंतर तर मविआ नामशेष झाली असे श्री. बन यांनी नमूद केले.
अजितदादांचा देवेंद्रजींवर विश्वास होता की नाही हे महाराष्ट्राने बघितले आहे. सकाळचा शपथविधी झाला होता त्यावेळेलाही अजितदादांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर विश्वास ठेवला होता. त्यानंतर शरद पवार, उद्धव ठाकरे व काँग्रेसची साथ सोडून अजितदादा पुन्हा एकदा देवेंद्रजींच्या बरोबर त्याच विश्वासापोटी आले होते असे श्री. बन म्हणाले. महाराष्ट्राचा विश्वासघात करण्याचे काम संजय राऊत आणि उद्धव ठाकरेंनी सातत्याने केले आहे. संजय राऊतांनी उभ्या हयातीत कुणावरही विश्वासही ठेवला नाही त्यामुळे राऊतांना विश्वास हा शब्द उच्चारण्याचा देखील अधिकार नाही असे श्री. बन म्हणाले.
शरद पवार यांना सोबत घेण्यास राष्ट्रवादी तयार नाही कारण अमित शाह आणि मोदींची इच्छा नसावी अशी बिनबुडाची फुटकळ टीका करणा-या राऊतांना श्री. बन यांनी खडे बोल सुनावले. शरद पवारांना राष्ट्रवादीसोबत घ्यायचे की नाही हे भाजपा, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ठरवणार नाहीत. हा निर्णय राष्ट्रवादीच्या सर्वेसर्वा सुनेत्रा पवार आणि राष्ट्रवादीचे नेते घेतील. दोन भावांना एकत्र न ठेवू शकलेल्यांनी दोन राष्ट्रवादींच्या विलीनीकरणामध्ये नाक खुपसू नये असे म्हणत श्री. बन यांनी उबाठा आणि राऊतांना टोला लगावला. कल्याण डोंबीवलीमध्ये राज ठाकरे यांनी उबाठा विरोधात भूमिका घेतली याची आठवण त्यांनी करून दिली.
देवेंद्र फडणवीस कायद्याचे रक्षक, कायदेविरोधी लोकांचे भक्षक
संजय राऊत यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करण्याची पात्रता नाही. 11 कोटी जनतेच्या आशीर्वादाच्या जोरावर मुख्यमंत्री फडणवीस हे महाराष्ट्राला सक्षम करण्याचे आणि कायद्याचे राज्य उभारण्याचे काम करत आहेत. उद्धव ठाकरे, राऊतांनी मात्र महाराष्ट्राची वर्षोनवर्षे लूट केली. राऊत यांच्यासारख्या कायदेविरोधी, भ्रष्ट लोकांना खरी जागा दाखवून देण्याचे काम श्री. फडणवीस करत आहेत
मुंबईत भाजपाचा महापौर होणे हा मुंबईसाठी सुवर्ण क्षण
मुंबई महापालिकेवर ज्या दिवशी महायुतीचा महापौर बसेल तो दिवस सुवर्ण दिन असणार आहे. 25 वर्ष मुंबईची होणारी लूट थांबवण्याचा, मुंबईला खड्ड्यातून बाहेर काढण्याचा तो सुवर्ण दिन असेल असे श्री. बन म्हणाले. अर्थातच उद्धव ठाकरे आणि राऊतांसाठी तो काळा दिवस असणार आहे. जनतेने तुम्हाला मतरूपी काळे फासले त्यामुळे तुम्हाला महाराष्ट्रामध्ये आणि मुंबईमध्ये तोंड दाखवायला देखील जागा राहिलेली नाही. आता पुढची पाच वर्ष तुमच्यासाठी रोजच काळा दिवस असेल अशी खोचक टिप्पणीही श्री. बन यांनी केली.
















