मुंबई, दि. 6 : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे महाराष्ट्रावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. त्यामुळे यंदा 9 फेब्रुवारी रोजी वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. पुष्पगुच्छ, भेटी आणू नयेत, शुभेच्छा देणारे होर्डिंग्ज लावू नये, तसेच वाढदिवसानिमित्ताने कोणताही सोहळा आयोजित करू नये, असे आवाहन एकनाथ शिंदे यांनी केले आहे.
अजित दादांच्या अकाली जाण्याच्या वेदनेतून महाराष्ट्र आजही सावरलेला नाही. व्यक्तिश: मी माझा सहकारी आणि मित्र गमावला आहे. दादांच्या निधनाने झालेली अपरिमित हानी भरून येणारी नाही. पवार कुटुंबाच्या दु:खात आपण सहभागी आहोत.
अशा या दुःखद परिस्थितीत वाढदिवस साजरा करणे, सोहळे-समारंभ करणे मला उचित वाटत नाही. त्यामुळेच परिस्थितीचे गांभीर्य आपण जपू या असे आवाहन श्री. शिंदे यांनी केले आहे. माझ्या वाढदिवसानिमित्ताने कुणीही पुष्पगुच्छ आणू नयेत, होर्डिंग्स लावू नयेत, तसेच कोणताही समारंभ, कार्यक्रम आयोजित करू नयेत, अशी विनंती उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी केली आहे.















