छत्रपती संभाजीनगर, दि.६(जिमाका)- महिला बचत गटांनी आपली खाद्यपदार्थांचे वा कृषी उत्पन्न आधारीत उत्पादने तयार करतांना आरोग्यपुरक उत्पादनांवर भर द्यावा,असे आवाहन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज येथे केले.
महिला आर्थिक विकास महामंडळातर्फे आज समुह साधन व्यक्तिंकरीता दोन दिवसीय हवामान बदल अनुकूलन प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले. या प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या हस्ते करण्यात आले. माविमचे जिल्हा समन्वयक चंदनसिंग राठोड, माविमचे विभागीय सल्लागार संदीप मराठे, उत्कर्ष भोळे, सुनिल पैठणे, फारह हुसेनी आदी उपस्थित होते.
समतामूलक परिवर्तन यंत्रणा उभारण्याच्या उपक्रमाचा भाग म्हणून या हवामान बदल अनुकूलन प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.दोन दिवस चालणाऱ्या या प्रशिक्षण कार्यक्रमात ५२ प्रशिक्षणार्थी महिलांना प्रशिक्षण देण्यात येत आहे. हवामान बदलांचा परिणाम ध्यानात घेऊन तयार करावयाची उत्पादने याबाबत हे प्रशिक्षण देण्यात येत आहे. खाद्यपदार्थी निर्मितीमध्ये उत्पादन ते विक्री अशी सक्षम साखळी निर्माण करण्यासाठी या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे.
जिल्हाधिकारी स्वामी यांनी सांगितले की, बचत गटाद्वारे उत्पादीत उत्पादनांना बाजारात चांगली मागणी असते. ही उत्पादने आरोग्यपूरक असावीत. पोषणमूल्य म्हणून बाजारात विक्री होणारी पेये, पदार्थ इत्यादींच्या उत्पादनात महिला बचत गटांनी योगदान द्यावे. त्यांच्या उत्पादनांच्या विक्रीसाठी बाजारात साखळी निर्माण करता येईल,असेही त्यांनी सांगितले. या उत्पादनांची विक्री, त्यासाठी करावे लागणारे ब्रॅंडींग, त्याचे लेखे तयार करणे इ.साठी ही महिलांना प्रशिक्षण देण्यात यावे,असे निर्देशही त्यांनी दिले.














