छत्रपती संभाजीनगर : सामाजिक, राजकीय चळवळीला गतिमान करण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मूकनायकपासून ते प्रबुद्ध भारतापर्यंत विविध वृत्तपत्र चालविली. एकीकडे अशिक्षित असणाऱ्या अश्पृश्य जनतेमध्ये जागृती करणे तर दुसऱ्या बाजुला वंचितांचे प्रश्न राजकीय पटलावर मांडणे या भूमिकेतून त्यांनी वृत्तपत्रातून लेखन केले. त्यांनी वैशिष्ट्यपूर्ण आणि प्रभावी भाषाशैलीचा वापर केला हा त्यांच्या लेखनातील महत्त्वाचा पैलू होय. बाबासाहेबांची सर्व वृत्तपत्रे ही मानवतेची प्रेरणा देतात, असे प्रतिपादन ज्येष्ठ आंबेडकरी साहित्यिक, समिक्षक, विचारवंत प्रा.डॉ. ऋषिकेश कांबळे यांनी केले.
शाक्यमुनि प्रतिष्ठान, बीडच्या वतीने दिला जाणारा ‘मूकनायक’ राज्यस्तरीय पुरस्कार (२०२६) शुक्रवारी ज्येष्ठ पत्रकार मधु कांबळे (कोपरी जि.ठाणे) यांना प्रदान करण्यात आला, यावेळी ते बोलत होते. खोकडपुरा भागातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनाच्या सभागृहात ‘मूकनायक दिना’निमित्त आयोजित पुरस्कार वितरण सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी शाक्यमुनि प्रतिष्ठान अध्यक्ष प्रा.शरद वंजारे तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून ज्येष्ठ आंबेडकरी साहित्यिक, विचारवंत प्रा.डॉ. ऋषिकेश कांबळे यांची उपस्थिती होती. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता एस.एस. भगत, कर्करोग महाविद्यालयाचे विशेष कार्य अधिकारी डॉ. अरविंद गायकवाड, नालंदा फाऊंडेशनचे अध्यक्ष प्रा. प्रदीप रोडे आणि समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त रविंद्र शिंदे यांची उपस्थिती होती. प्रमुख मार्गदर्शनात डॉ.ऋषिकेश कांबळे यांनी बाबासाहेबांच्या वृत्तपत्रांचा आढावा घेत त्यातील भाषाशैलीवर प्रकाश टाकताना सांगितले की, तत्कालीन कोणत्याही संपादनकांकडे नसलेली भाषाशैली बाबासाहेबांनी वापरली. केशरीने मूकनायक वृत्तपत्राची जाहिरात प्रसिद्ध करण्यास नकार दिला होता. यावरून तत्कालीन वृत्तपत्रे जाती प्रभुत्वाच्या भूमिकेतून चालविली जात होती, हे प्रतीत होते. मात्र, बाबासाहेबांच्या लिखानाचा केंद्रबिंदू हा मानवता होता, असेही त्यांनी सांगितले. सत्काराला उत्तर देताना पत्रकार मधु कांबळे यांनी मूकनायक पुरस्कारासाठी आपली निवड केल्याबद्दल आनंद व्यक्त करीत आभार मानले. आपल्या मनोगतात त्यांनी बाबासाहेबांच्या वृत्तपत्रांतील अग्रलेखांवर प्रकाश टाकला. लोकशाहीच्या तीन स्तंभांना संविधानाच्या चौकटीतच काम करावे लागते. मात्र, प्रसार माध्यमे हा चौथा स्तंभ हा संविधानाच्या स्वातंत्र, समता, बंधुता या मुल्यांच्या विरोधात जाऊन काम करीत असल्याबद्दल खंत व्यक्त केली. जातीव्यवस्था नष्ट झाल्याशिवाय देशाची प्रगती नाही, असे बाबासाहेबांनी सांगितले होते. परंतु सध्या विविध मार्गाने हीच जातीव्यवस्था बळकट करण्याचे काम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
त्यामुळे सध्याच्या पत्रकारांनी बाबासाहेबांच्या पत्रकारितेचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून वैज्ञानिक दृष्टीकोण, विवेक, धर्मनिरपेक्षता ही संविधानीक मूल्य जोपासत पत्रकारिता करावी, असे आवाहन केले. यावेळी एस.एस.भगत, डॉ. अरविंद गायकवाड यांनी बाबासाहेबांच्या पत्रकार, संपादक या पैलूवर सखोल प्रकाश टाकला. तर सामाजिक चळवळीत प्रत्येकाने सहभाग देणे ही आपली जबाबदारी असून बाबासाहेबांच्या समतेच्या रथाला अधिक गतिमान केले पाहिजे, असे आवाहन प्रा. प्रदीप रोडे यांनी केले. शाक्यमुनी प्रतिष्ठानची मूकनायक पुरस्कार देण्यामागील भूमिका प्रा. शरद वंजारे यांनी अध्यक्षीय मनोगतातून स्पष्ट केली. प्रास्ताविक प्रा. राम गायकवाड यांनी केले. तर पुरस्कार वितरण सोहळ्याचे बहारदार संचालक प्रा.अंकुश कोरडे यांनी केले. संतोष प्रधान यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राचार्य कृष्णा कांबळे, प्रा. प्रल्हाद तारू, प्रा. राजेंद्र भगत, प्रा.आश्मिता साळवे, ज्योती मोरे, स्वप्नाली सुतार, प्रज्ञा सोनवणे, पवन मस्के यांनी परिश्रम घेतले. पुरस्कार वितरण सोहळ्यास विविध घटकांतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
















