शहापूर :- शहापूर शहरातील मुख्य बाजारपेठेत दररोज वाहनांची प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे.शहरातील पंडीत नाका ते पंचायत समिती व पुढे संतोष हॉटेल या मुख्य रस्त्यावर वाहनांची वाहतूक कोंडी असल्याने यातुन रस्ता शोधत चालतांना जेष्ठ नागरिक,महिला,लहान शाळकरी विद्यार्थी यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.या वाहतूक कोंडीचा फटका रुग्णांना उपचारासाठी घेऊन जाणाऱ्या रुग्ण रुग्णवाहिकांना देखील बसत आहे.
शहरात रोज रिक्षा,दुचाकी,कार,या वाहनांच्या कोडींने संपूर्ण मुख्य रस्ता व्यापला जातो आहे.ही वाहतूक कोंडी सकाळच्या वेळेस व सांयकाळी येथे पाहावयास मिळते शहरात कुठेही पार्किंगची सोय नाही परिणामी आपल्या मनमानी प्रमाणे रस्त्याच्या कडेला दुचाकी वाहने अडवी तीडवी कशीही अगदी रस्त्यावर उभी केली जातात परिणामी या दुचाकीच्या बेकायदेशीर पार्किंगमुळे शहरात वाहतूक कोंडी होते आहे.ही कारणं तर रोज वाहनांच्या कोंडीस पुरेसी आहेतच परंतु या शहरात जर एखादे अवजड मालवाहू ट्रक, डंपर शहरात आल्यास लगेच रस्त्यावर वाहनांची रांग लागते व वाहतूकीची कोंडी होते.यात शेकडो रिक्षा अडकून पडतात यामुळे आसनगाव रेल्वेस्थानकात जाणाऱ्या चाकरमानी व अन्य प्रवाशांना रेल्वे स्थानकात जाण्यास विलंब होतो.तर या वाहनांच्या कोंडीत रुग्ण घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहीका देखील अडकून पडतात अवजड ट्रक,डंपर यांना सकाळी शहरात गर्दीच्या वेळेस प्रवेश बंदी करणे गरजेचे असतांना शहापूर वाहतूक पोलीस शहरात येणाऱ्या या मालवाहु ट्रक व डंपर या अवजड वाहनांना बंदी घालतांना दिसत नाहीत किंवा त्यांच्यावर कारवाई करीत नाहीत असे एकंदरीत चित्र येथे दिसत आहे.शहापूर शहारातील वाहतूककोंडीची ही समस्या रस्त्यावरुन चालणाऱ्या पादचाऱ्यांकरीता दररोजची एक डोकेदुखी ठरली आहे.वर्षांनुवर्ष या समस्येने नागरिक कमालीचे त्रस्त आहेत.मात्र शहापूर वाहतूक पोलिस व शहर नगरपंचायतीचे कुठलेच योग्य नियोजन नसल्याने या सर्व यंत्रणेच्या दुर्लक्षपणामुळे शहापूरात वाहतूक कोंडीची समस्या जठील बनली आहे.
















