सिल्लोड ( प्रतिनिधी ) दि.9, जिल्हा परिषद निवडणुकीत अंभई गटातून शिवसेना उमेदवार अब्दुल आमेर अब्दुल सत्तार यांचा तर अंभई गणातून रजनीताई नगरे यांनी मोठ्या मताधिक्याने दणदणीत विजय मिळवला आहे.या विजयामुळे अंभई गावासह परिसरात आनंदाचे वातावरण पसरले असून नगराध्यक्ष अब्दुल समीर अब्दुल सत्तार तसेच विजयी उमेदवार अब्दुल आमेर, रजनीताई नगरे यांच्या उपस्थितीत समर्थक व कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्तपणे विजयी रॅली काढत जल्लोष साजरा केला.
निकाल जाहीर होताच गावातील नागरिक, युवक व महिला मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले. ढोल-ताशांचा गजर, फटाक्यांची आतषबाजी आणि घोषणांनी संपूर्ण अंभई गाव दुमदुमून गेले. विजयी रॅलीत जय भवानी, जय शिवाजी,“आमदार अब्दुल सत्तार आगे बढो” , अशा घोषणा देण्यात आल्या.
रॅलीदरम्यान एक वाहनाला फुलांनी सजविण्यात आले होते. या वाहनातून अब्दुल आमेर यांनी शुभेच्छांचा स्वीकार केला. यावेळी नागरिकांनी अब्दुल आमेर अब्दुल सत्तार यांच्यावर फुलांची उधळण करत जल्लोष केला. अनेकांनी मिठाई वाटून आनंद साजरा केला.
यवेळी कृउबा समितीचे संचालक दामूअण्णा गव्हाणे सरपंच रामदास दुतोंडे, उपसरपंच रईस देशमुख आदिंसह ग्रामस्थ, सामाजिक कार्यकर्ते, स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते.
विजयानंतर बोलताना अब्दुल आमेर अब्दुल सत्तार यांनी हा विजय आमदार अब्दुल सत्तार यांच्या नेतृत्वाचा, जनतेच्या विश्वासाचा असल्याचं सांगितलं. “अंभई गटातील नागरिकांनी माझ्यावर जो विश्वास टाकला आहे, तो मी कधीही डळमळू देणार नाही. सर्वसमावेशक विकास, पाणी, रस्ते, शिक्षण, आरोग्य आणि रोजगार या मुद्द्यांवर प्राधान्याने काम करणार आहे,” अशी ग्वाही त्यांनी दिली. तसेच त्यांनी प्रचारादरम्यान परिश्रम घेतलेल्या सर्व कार्यकर्त्यांचे आणि मतदारांचे आभार मानले.
————-
याप्रसंगी नगराध्यक्ष अब्दुल समीर यांनी देखील मतदारांचे आभार मानले. या विजयाचे श्रेय मतदारांच्या विश्वासाला आणि आमदार अब्दुल सत्तार यांच्या सातत्यपूर्ण विकासकामांना असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं. “ अब्दुल आमेर जनतेने दिलेला विश्वास विकासकामांच्या माध्यमातून सार्थ ठरवेल ” असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
















