छत्रपती संभाजीनगर : शारिरीक आणि मानसिक स्वास्थ्य उत्तम राखण्यासाठी दिनचर्या आणि आहार हे चांगले असायला हवे. उत्तम आरोग्य असेल तरच पुढची पिढी देशाच्य विकासात योगदान देऊ शकेल. त्यासाठी चांगलं खा आणि चांगलं व्हा, असा संदेश आज जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज विद्यार्थ्यांना दिला.
एमआयटी हायस्कूल सिडको एनफोर येथे ‘संस्कार दशसूत्री’ चा या उपक्रमांतर्गत आरोग्य समुपदेशन कार्यक्रम संपन्न झाला. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी व मनपा आरोग्य अधिकारी डॉ. पारस मंडलेचा यांनी आहार, दिनचर्या आणि आरोग्य याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. डॉ. मेघा जोगदंड, शिक्षणाधिकारी आश्विनी लाठकर, आयएमए अध्यक्ष डॉ. अनुप टाकळकर,डॉ.पूजा करोले, शिक्षण विस्तार अधिकारी मनीषा वाशिंबे, शिक्षण विस्तार अधिकारी कल्पना पदकोंडे तसेच एमआयटी शाळेचे मुख्याध्यापक संजय वानखेडे, संत मीरा शाळेचे मुख्याध्यापक अनिल पाटील, महर्षी शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती उषा मालोदे,तसेच आनंद विद्या मंदिर चे मुख्याध्यापक गणेश मालोदे आणि या शिक्षक वृंद उपस्थित होते.
कार्यक्रमासाठी परिसरातील महर्षी विद्यालय, संत मीरा विद्यालय, आनंद विद्यामंदिर या शाळांचे विद्यार्थीही एमआयटी शाळेच्या प्रारंगणात जमले होते. या चारही शाळांमधील सुमारे एक हजार विद्यार्थ्यांनी आज आरोग्य विषयक शपथ घेतली.
जिल्हाधिकारी दिलीप स्वामी म्हणाले की, शारीरिक आरोग्या सह मानसिक आरोग्य आवश्यक आहे. सक्षम भविष्य निर्माण करायचं असेल तर आजच्या विद्यार्थ्यांनी आपले आरोग्य जपावे. बाजारात आकर्षक पॅकिंग मध्ये मिळणारे जंक फूड, फास्ट फूड, कोल्ड ड्रिंक मुळे शरिरावर दुष्परिणाम होतात. त्यापेक्षा आईने बनवलेली भाजी, चपाती, भाकरी हे अन्न सकस आणि पौष्टिक असते. असे चांगले अन्न खा आणि चांगले व्हा, असे त्यांनी सांगितले.
याच कार्यक्रमात मनपा आरोग्य अधिकारी डॉ. पारस मंडलेचा,डॉ.मेघा जोगदंड यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
२२२४ शाळांमध्ये आरोग्य समुपदेशन
या उपक्रमाची सुरुवात दि.२८ पासून करण्यात आली. आतापर्यंत २२२४ शाळांमध्ये आरोग्य समुपदेशन करण्यात आले. त्यात शहरातील ४७५ शाळांमध्ये आरोग्य विषयक समुपदेशन करण्यात आले होते. त्यात १ लाख २ हजार ५२२ विद्यार्थी तर २८४३ शिक्षकांचा सहभाग होता. शिवाय ग्रामीण भागातील १५४२ शाळांमधील २ लाख ३४ हजार ७०८ विद्यार्थी तर ५३१२ शिक्षकांचा समावेश होता.
आज शहरातल्या २०७ शाळांमध्ये आरोग्यविषयक समुपदेशन शिबीरे पूर्ण झाली. प्रास्ताविक श्रीमती मनीषा वाशिंबे यांनी तर सूत्रसंचालन श्रीमती कविता रगडे यांनी केले. मुख्याध्यापक संजय वानखेडे यांनी आभार मानले.
















