छ्त्रपती संभाजीनगर दि.१९ : स्वराज्याचे स्वप्न साकार करण्यासाठी प्रजेचाही सक्षमपणे पाठिंबा मिळाला पाहिजे हे शिवरायांना अवगत होते. त्यामुळे त्यांनी प्रजेचा विश्वास संपादन करून अर्थव्यवस्थेला अनुसरून अमुलाग्र बदल केले. शस्त्र आणि शास्त्र हेच स्वराज्य निर्मितीमागचे सूत्र होते, असे प्रतिपादन प्रख्यात व्याख्याते डॉ. केदारनाथ फाळके यांनी केले.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील शिवजयंती उत्सव कार्यक्रमात ते बोलत होते. प्रारंभी छत्रपती शिवरायांच्या तैलचित्राची नाट्यगृह अशी मिरवणूक ढोल ताशांच्या गजरात काढण्यात आली. तीन तासाच्या मिरवणुकीनंतर मुख्य कार्यक्रम सुरू झाला. मा. कुलगुरू डॉ.विजय फुलारी यांच्या अध्यक्षतेखाली नाट्यगृहात गुरुवारी (दि.१९) ही कार्यक्रम झाला. यावेळी प्र-कुलगुरू डॉ. वाल्मीक सरवदे, व्यवस्थापन परिषद सदस्य काशीनाथ देवधर, नितीन जाधव, कुलसचिव डॉ. प्रशांत अमृतकर, विद्यार्थी विकास मंडळाचे संचालक डॉ. कैलास अंभुरे यांची प्रमुख उपस्थिती होती. ‘शिवछत्रपतींची अर्थव्यवस्था’ या विषयावर बोलताना ते पुढे म्हणाले, अर्थव्यवस्था हे राज्याचे महत्त्वपूर्ण अंग आहे. राज्य व्यवस्थितपणे चालायचे असेल, प्रजेचं कल्याण करायचे असेल तर अर्थव्यवस्था मजबूत असणे आवश्यक असते. रयतेच्या हिताची अर्थव्यवस्था हे मिशन शस्त्राच्या आधारे साकार केले जाऊ शकत नाही. अर्थव्यवस्थेच्या मजबुतीसाठी छत्रपती शिवरायांनी सुरुवातीपासून इनाम व्यवस्था व जमीन महसुल व्यवस्थेकडे लक्ष दिले. सोबतच त्यांनी जागीर व्यवस्था पूर्णतः नष्ट करून टाकली आणि वतन व्यवस्था त्यांनी सुधारली असे दोन महत्त्वपूर्ण बदल त्यांनी घडवून आणले. वतनदारांचा प्रजेवरचा हात काढून घेतला. या वतनदारांनी परस्पर शेतकऱ्यांकडून जमीन महसुल वसूल करायचा नाही, सोबतच जमीन महसुलाचा दर ठरवून दिला आणि वतनदारांचे वाडे, कोट नष्ट केले. यामुळे महसूल व्यवस्था व्यवस्थित झाली. शिवाय पोर्तुगीजांच्या मिठावर भरभक्कम कर आकारला त्यामुळे स्वराज्यातील मिठाची विक्री वाढली. यामुळे त्यांची अर्थव्यवस्था बळकट झाली, असेही ते म्हणाले. अध्यक्षीय समारोपात मा.कुलगुरु डॉ विजय फुलारी म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेच्या हितासाठी १७ व्या शतकात उत्तम अर्थव्यवस्था निर्माण केली. स्वराज्यातील महसुल व्यवस्था आदर्श होती. शिवाजी महाराजांच्या विचारांचा वसा आणि वारसा नेटाने पुढे नेणे हीच खरी त्यांना आदरांजली ठरेल, अशी ते म्हणाले. यावेळी नेताजी सुभाषचंद्र बोस व शिवजयंती निमित्त छत्रपती शिवाजी महाराज अध्यासन केंद्रामार्फत घेण्यात आलेल्या विविध स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिक वितरण करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. प्रशांत अमृतकर यांनी केले. छत्रपती शिवाजी महाराज अध्यासनाचे संचालक डॉ.पुरुषोत्तम देशमुख यांनी सूत्रसंचालन तर डॉ.कैलास अंभुरे यांनी आभार मानले.
















