जालना : राज्यात आरक्षणाच्या मुद्द्यावरुन वातावरण चांगलंच तापलं आहे. मनोज जरांगे यांच्या उपोषणाची दखल घेत राज्य सरकारने मराठा आरक्षणाच्या मागण्यांसाठी 1 महिन्यांचा अवधी मागितला. त्यानंतर, मनोज जरांगे यांनी आपलं उपोषण मागे घेतलं. मात्र, दुसरीकडे ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही, याची गॅरंटी द्या, अशी मागणी करत लक्ष्मण हाके वडीगोद्री गावात उपोषणाला बसले आहेत. गेल्या 2 दिवसांपासून त्यांच्या उपोषणाला पाठिंबा वाढत असून त्यांनी पाणीही घेणे बंद केले आहे. त्यामुळे, उपोषणकर्ते लक्ष्मण हाके यांची प्रकृती बिघडली असून आज डॉक्टरांनी त्यांची तपासणी केली. रक्तदाब वाढत असल्याने हाके यांना ईसीजी लावण्यात आला असून कार्यकर्त्याकडून लक्ष्मण हाके यांना पाणी पिण्यासाठी मोठा आग्रह केला जातोय, यावेळी भावुक होऊन ओबीसी कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजीही केली जात आहे.
ओबीसी समजााच्या न्याय व हक्कासाठी आपलं उपोषण आहे, असे म्हणत लक्ष्मण हाके यांनी 5 दिवसांपासून उपोषणाला सुरुवात केली आहे. त्यातच, गेल्या 2 दिवसांपासून पाणी पिणेही बंद केले आहेत. त्यामुळे, त्यांची प्रकृती बिघडत चालली असून अशक्तपणाही आला आहे. लक्ष्मण हाके यांच्या शरीरातील शुगर आणि पाणीपातळी खालावली, चक्कर येत असल्याने डॉक्टरांच्या पथकाकडून त्यांना उपचाराचा आग्रह करण्यात आला. मात्र, हाके यांच्याकडून उपचार घेण्यास नकार देण्यात आला आहे. तर, डॉक्टरांनी सलाईन लावण्याची विनंती केली, पण सलाईन घेण्यासही त्यांनी नकार देत आपलं प्राणांतिक उपोषण सुरूच राहणार असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे, ओबीसी समाज बांधवांकडून हाके यांच्या उपोषणस्थळी गर्दी होत आहे.
ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके आणि त्यांचे सहकारी नवनाथ वाघमारे यांच्या उपोषणाचा आजचा सहावा दिवस असून जिल्हा शल्य चिकित्सकाच्या पथकाने आज उपोषणस्थळी जाऊन त्यांच्या शारिरीक प्रकृतीची तपासणी केली. हाके यांच्या शरिरातील शुगर आणि पाणी पातळी खालवल्यामुळे त्यांना चक्कर येत असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. दरम्यान त्यांना उपचाराची गरज असल्याचं डॉक्टरांनी म्हटले आहे. मात्र, डॉक्टरांच्या आग्रहानंतरही हाके यांनी उपचारास नकार दिला.