बांधकाम सुरु असलेला पूल कोसळल्याची धक्कादायक घटना बिहारच्या अररियामध्ये घडली आहे. कोसळलेला पूल बनवण्यासाठी 12 कोटी रुपयांचा खर्च आल्याची माहिती आहे. 12 कोटी रुपयांचा पूल उद्घाटनाआधीच कोसळला, त्यामुळे पुलाच्या कामात गैरव्यवहार झाल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. दरम्यान, या घटनेचा व्हिडीओ व्हायरल सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. पूल कोसळल्यानंतर एसपी सिंगला कंपनीत गार्ड म्हणून काम करणारा एक व्यक्ती बेपत्ता असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याचा मृतदेह अद्याप सापडलेला नाही. त्याचा शोध घेण्यासाठी एसडीआरएफ आणि एनडीआरएफ पथकांकडून शोध सुरू असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.
बिहारच्या अररिया जिल्ह्यातील सिकटी प्रखंड येथे पूल दुर्घटना घडली आहे. कोट्यवधी खर्च करुन बकरा नदीच्या पडरिया घाटावरील निर्माणाधन पूल अचानक कोसळला. पूल एखाद्या पत्त्यांच्या बंगल्यासारखा कोसळून नदीत सामावून गेला. ही धक्कादायक घटना कॅमेऱ्यामध्ये चित्रित झाली आहे. पूल दुर्घटनेनंतर पुलाच्या बांधकामात निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरण्यात आल्याचा आरोप नागरिकांनी केला असून त्यामुळे उद्घाटनापूर्वीच पूल कोसळल्याचं म्हटलं जात आहे.