मुंबई, ( प्रतिनिधी ) वृत्तपत्रे नियमित वाचून, जागृततेने विचार मंथन करणाऱ्या पत्रलेखकांबद्दल मला आदर आहे. वृत्तपत्र लेखक, पत्रकार आणि वाचक यांचा संगम आणि संवाद वैचारिक व्याख्यानमालांमधून होत असतो. कमीत कमी शब्दात अधिकाधिक आशय मांडण्याचे कसब त्यातून मिळते. परंतु बौद्धिक देणारी व्याख्यानमाला संस्कृती लयास जात असून, मात्र तिचे संवर्धन होणे गरजेचे असल्याचे माजी राज्यपाल, तथा माजी केंद्रीय मंत्री रामभाऊ नाईक यांनी ‘पत्रकार दिन’ समारंभात दादर येथे बोलताना काढले.
मराठी वृत्तपत्र लेखक संघाचा 24 वा वर्धापन दिन आणि यंदाचा ‘पत्रकार दिन’ सोहळा सोमवारी मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय, येथे संपन्न झाला. यावेळी पत्रलेखकांचे राज्यस्तरीय संमेलनही यावेळी आयोजित करण्यात आले होते. पद्मभूषण रामभाऊ नाईक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे, ज्येष्ठ पत्रकार तुळशीदास भोईटे व दै. प्रहारचे संपादक डॉ. सुकृत खांडेकर, ज्येष्ठ लेखक रेमंड मच्याडो यावेळी मंच्यावर उपस्थित होते.
या सोहळ्यात यंदाचा ‘दर्पणकार स्व. बाळशास्त्री जांभेकर स्मृती पुरस्कार’ वसई-विरार महानगर पत्रकार संघाचे अध्यक्ष व कोकण मराठी साहित्य परिषदेचे पालघर जिल्हा कार्याध्यक्ष, तथा ज्येष्ठ पत्रकार अनिलराज रोकडे यांना प्रदान करण्यात आला. तर ‘कै. यशवंत पाध्ये स्मृती पुरस्कार’ दै. परभणी शिल्पकारचे संपादक भूषण मोरे यांना देण्यात आला. त्याचबरोबर ‘उद्योगभूषण पुरस्कार’ ‘गार्डवेल इंडस्ट्रीज’चे सीएमडी विल्यम अँथनी तुस्कानो आणि ‘ई- बायोटोरियम नेटवर्किंग’चे सीएमडी सागर जोशी यांना, तसेच ‘आरोग्यभूषण पुरस्कार’ डॉ. प्रवीर पारकर आणि सर्वोत्कृष्ट दिवाळी अंकाचा पुरस्कार ‘ऋतुरंग दिवाळी अंका’चे संपादक अरुण शेवते व ‘उद्योग-रत्न’ पुरस्कार उद्योजिका सौ. भारती पवार यांना बहाल करण्यात आला. राज्यातील नामवंत पत्रकारांना यावेळी गौरविण्यात आले.
सध्याचा काळ हा रामायणाचा नसून, वाल्मिकीचा काळ आहे. देशामध्ये गांधी आहेत, पण महात्मा नाहीत, चव्हाण आहेत, पण यशवंतराव नाहीत. महाराष्ट्राचे हल्लीचे राजकारण रसातळाला गेले असून, एकंदरीत विदारक चित्र पाहता, असा कोणी नेता दिसत नाही, जो विधायक समाजकारण आणि राजकारण करून महाराष्ट्राला पुढे प्रगतीवर नेईल असे ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे आपल्या भाषणात म्हणाले.
आजची आधुनिक पत्रकारिता, प्रिंट मीडिया, सोशल मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक्स मीडिया यांच्यातील स्पर्धा, पत्रकारितेत ‘एआय’ ( कृत्रिम बुद्धिमत्ता ) चा वापर तारक की मारक?, पत्रकारिते पुढील नवी आव्हाने आदी विषयांवर ज्येष्ठ पत्रकार तुळशीदास भोईटे व दै. प्रहारचे संपादक डॉ. सुकृत खांडेकर यांनी आपापली मते मांडून उपस्थितांचे प्रबोधन भाषणातून यावेळी केले.
मराठी वृत्तपत्र लेखक संघाचे संस्थापक अध्यक्ष एकनाथ बिरवटकर यांनी प्रस्ताविक करताना, संस्थेने आता रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण केले असून, पुढील वर्षभरात त्यानिमित्ताने विविध उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे सांगितले. यावेळी शासनाच्या अधिस्वीकृती समितीच्या कोकण विभागाचे अध्यक्ष श्रीकांत चाळके, दै. वसई विकास चे संपादक विजय खेतले, ‘लीलाई’च्या संपादिका सौ. पूजा रोकडे, ‘सनातन संस्थे’च्या सौ. मंगला राऊत, पत्रकार संतोष गायकवाड व चंद्रकांत भोईर, संघाचे पदाधिकारी शंकर राहाणे व शंकर शिंदे प्रामुख्याने उपस्थित होते. सूत्रसंचालन सुबोध जाधव यांनी, तर आभार प्रदर्शन संघाचे कार्यवाह संतोष धोत्रे यांनी केले.